नांदेड, दि. १५ मे २०२५:
पंतप्रधान आवास योजना टप्पा-२ अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती.
दोनच दिवसांपूर्वी खा. अशोकराव चव्हाण यांनी या सर्वेक्षण मोहिमेचा आढावा घेतला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाची गती मंदावली असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेच्या माध्यमातून बेघरांना तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या गरजू नागरिकांना पक्क्या घराची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे कोणताही गरजू व पात्र नागरिक या सर्वेक्षणातून वंचित राहता कामा नये, अशी भूमिका खा. अशोकराव चव्हाण यांनी या बैठकीत घेतली. या योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे होती. परंतु, ही मुदत वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेता त्यांनी तातडीने ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या संदर्भातील आदेश जारी झाले आहेत. १५ दिवसांच्या वाढीव मुदतीमध्ये प्रशासनाने व्यापक स्तरावर जनजागृती करून जास्तीत जास्त संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी. तसेच गरजूंनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी किंवा नगरपरिषद व नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

