
शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजपरिवर्तनाचा शिल्पकार असतो. आपल्या शैक्षणिक कार्यातून, सामाजिक बांधिलकीतून आणि कृतीशील जीवनातून हा आदर्श प्रत्यक्षात उतरविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय शिवश्री पंडितराव गोविंदराव कदम. नियत वयोमानानुसार शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असून त्यांच्या चार दशकांच्या प्रदीर्घ सेवाकाळाने असंख्य विद्यार्थी, पालक आणि समाजमनावर अमिट ठसा उमटविला आहे.
ऑगस्ट 1989 मध्ये कदम सरांची आलेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्रथम नियुक्ती झाली. त्या काळात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एकशिक्षकी होती. शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबरच सर्व प्रशासकीय व अशैक्षणिक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. शाळेला पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी मूळ गाव चिखली येथे ये-जा न करता आलेगावातच मुख्यालयी राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शिस्तीवर विशेष भर दिला. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड, वेळेचे नियोजन आणि शिस्तीच्या सवयी दृढ झाल्या.
कदम सर कडक शिस्तीचे असले तरी ते तितकेच प्रेमळ आणि विद्यार्थीहित जपणारे शिक्षक होते. शाळेतील पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणारे दूध स्वतः गरम करून त्यात स्वतःच्या खर्चाने साखर घालून देण्याची त्यांची सवय विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचे प्रतीक होती. पोषण, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही बाबींचा समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्येक कृतीतून दिसून येत असे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा विशेष भर होता. शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.
शैक्षणिक क्षेत्राइतकेच सामाजिक क्षेत्रातही कदम सरांचे योगदान उल्लेखनीय आहे. मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक कार्यकर्ता शिबिरे, प्रबोधनात्मक व्याख्यानमाला आणि सामाजिक परिवर्तनवादी उपक्रम राबविले. ग्रामीण भागातील गरजू व गुणवंत मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरात राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या मराठा मुलींच्या वसतिगृहासाठी त्यांनी आर्थिक तसेच वेळेचे मोलाचे योगदान दिले.
“जे बोलतो तेच आचरणात आणले पाहिजे,” हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र राहिला. सामाजिक विचार, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठा यांचा त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. समाजाला दिलेला संदेश स्वतःच्या जीवनातून जगण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
मागील अनेक वर्षांपासून नांदेड येथे त्यांनी ‘शिवार’ पुस्तक व स्टेशनरी केंद्र उभारून वाचनसंस्कृती जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. महापुरुषांची चरित्रे, परिवर्तनवादी साहित्य, विविध नामवंत लेखकांची पुस्तके आणि समाजप्रबोधन करणारी ग्रंथसंपदा उपलब्ध करून देत त्यांनी ज्ञानप्रसाराची चळवळ उभी केली. “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी” या संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रत्यय त्यांच्या उद्योगशील कार्यातून येतो.
कदम सरांच्या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी शिवमती महानंदाताई कदम यांचेही मोलाचे योगदान आहे. त्या स्वतः विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून दोघांनी मिळून आपल्या दोन्ही मुलांवर उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम मूल्यांची जपणूक केली. त्यांची दोन्ही मुले आयआयटीचे पदवीधर असून कुटुंबाच्या यशस्वी वाटचालीत धाकटे बंधू हिरामण पाटील कदम यांचीही उल्लेखनीय साथ लाभली.
शिक्षक, समाजप्रबोधक, विचारवंत आणि कृतीशील कार्यकर्ते म्हणून शिवश्री पंडितराव कदम यांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







