
राजकारणात अनेक नेते पाहायला मिळतात; परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांना जवळून अनुभवण्याचा योग आला की त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख होते. मा. शंकर अण्णा धोंडगे हे असेच लोकाभिमुख, अभ्यासू, संवेदनशील आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवणारे नेतृत्व आहे.
आज अण्णांसोबत काही काळ फिरण्याचा योग आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. अनेक वर्षांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीचे नाव, त्यांचे गाव, त्यांच्याशी संबंधित प्रसंग, अगदी शेतात एकत्र केलेल्या कामांच्या आठवणीही ते आज तितक्याच आत्मीयतेने सांगतात. प्रत्येकाला नावाने हाक मारण्याची त्यांची शैली ही केवळ सवय नसून माणसे जपण्याची त्यांची संस्कृती आहे.
अण्णांचा जीवनप्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. सामान्य कुटुंबातून कठोर परिश्रम, समाजकारण आणि जनतेशी प्रामाणिक नाते जोडत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच आजही सामान्य माणूस विश्वासाने म्हणतो—”काम असेल तर अण्णांकडे चला.”
या विश्वासामागे अनेक अनुभव आहेत. सहजच एकदा अण्णा गावात आले असताना मी त्यांना सांगितले की बाचोटी गावातील शेतकऱ्यांची बिले सहा-सात महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अण्णांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून पाठपुरावा केला आणि दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. त्या दिवशी जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांच्या तत्परतेची आणि प्रभावी पाठपुराव्याची खरी ताकद अनुभवायला मिळाली.
फक्त एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद हायस्कूल, बाचोटी येथे इंग्रजी माध्यमाला मान्यता मिळवून देण्याचा विषय असो किंवा विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल मंजूर करून आणण्याचा प्रश्न असो, अण्णांनी विशेष लक्ष घालून ही कामे मार्गी लावली. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे विकासकामे पूर्ण करणे हीच त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे.
महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य नेतृत्वाची जबाबदारी आपल्या बाचोटी गावच्या भूमिपुत्राला मिळाली, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. त्यानंतर आमदार म्हणूनही त्यांनी लोहा–कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड केली.
गावातील वीजपुरवठ्याचे प्रश्न असोत, शेतकऱ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांच्या समस्या, महिलांचे प्रश्न किंवा ग्रामीण आरोग्य सेवेशी संबंधित बाबी असोत—अण्णा प्रत्येक विषय गांभीर्याने ऐकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या अडचणी आपल्या अडचणी समजून काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
अण्णांच्या स्वभावातील आणखी एक मोठा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. मोठे पद, मोठा जनसंपर्क आणि मोठी जबाबदारी असूनही ते प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधतात. कार्यकर्त्यांना आपलेसे करतात, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळेच त्यांच्या भोवती विश्वासाचे आणि आत्मीयतेचे नाते निर्माण झाले आहे.
आजच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर समाजाशी सतत जोडलेले राहून लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही भूमिका अण्णांनी आपल्या कार्यातून सिद्ध केली आहे. संघर्ष, प्रामाणिकपणा, कार्यकर्त्यांवरील प्रेम, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विकासाची तळमळ यामुळे मा. शंकर अण्णा धोंडगे हे लोहा–कंधार मतदारसंघातील विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि खंबीर नेतृत्व म्हणून जनमानसात ओळखले जातात.
गाव, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निस्वार्थपणे झटणारे, संघर्षातून घडलेले, माणुसकी जपणारे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे आमच्या बाचोटी गावचे भूमिपुत्र मा. शंकर अण्णा धोंडगे यांना मनःपूर्वक सलाम!
लेखन : सुनील हराळे पाटील
मराठवाडा अध्यक्ष, शिव महासंग्राम संघटना तथा पत्रकार






