
शिवाजी आता निवृत्त होतो आहे, त्यावर लेख लिहा, असा गौरव समितीने मला निरोप पाठवला तेव्हा एकदम लक्षात आलं, अरे शिवाजीही निवृत्तीच्या वयाचा झाला की. आपण आपल्या धाकट्या पिढीला कायम लहानच समजत असतो. तेही पाहता पाहता आपल्या मागोमाग वयस्क होत असतात, हेही आपल्या लक्षात येत नाही. तसंच काहीसं शिवाजीविषयी झालेलं आहे. शिवाजी म्हणजे शिवाजी अंबुलगेकर ह्या माझ्या कवीमित्राविषयी मी हे बोलतोय.
शिवाजी हे नाव ऐतिहासिक आणि थोर असलं तरी त्या नावात आणि उच्चारात एक लय आहे, हे आपल्या फारसं लक्षात येत नाही. शिवकाळात शहाजी, शिवाजी, सूर्याजी, संभाजी, तान्हाजी अशी सगळी परंपरा होती. तशी लय शिवाजीच्या वाट्याला कायमच आली. त्याचं आडनावही अंबुलगेकर हे देखील उच्चारायला किती गोड वाटतं ! शिवाय तुकोबाच्या अंबिले या आडनावाच्या जवळ जाणारं. त्याचं नोकरीच्या ठिकाणाचं नावही मोठं लयबद्ध आहे, कमळेवाडी. त्याची चेहरेपट्टीही साक्षात राजा शिवाजीसारखी इथून तिथून लयबद्ध. त्यामुळे शिवाजी हे नाव त्याला कायमच शोभून दिसलं. नाही तर नावात काय आहे, असं आपण म्हणतच असतो. पण शिवाजीच्या संदर्भात नावात काहीतरी आहे, हे सततच जाणवत राहिलं.
शिवाजीनं मुखेड तालुक्यातल्या कमळेवाडीसारख्या तांड्यावर आयुष्यभर नोकरी केली. एखादा तक्रार करत बसला असता, ‘त्या आदिवासी भागात नोकरी असल्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालं. मी काहीच लिहू, वाचू शकलो नाही’. पण शिवाजीचं नेमकं याउलट. त्यानं तो सगळा तांडाच सुसंस्कृत, वाङ्मयीन करून टाकला केला. तिथं कितीतरी कार्यक्रम घेतले. तिथले भटके विमुक्तही लिहिते, वाचते करून टाकले. तिथं साधी आदिवासी तांड्यावरील आश्रमशाळा असूनही त्यानं ‘मायबोली’ सारखे एक भव्यदिव्य साहित्यसंमेलन घेऊन दाखवलं. त्या निमित्तानं मराठीतले थोर थोर लेखक, कवी त्या तांड्यावर येऊन गेले. बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित असलेला ‘खान्देशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा’ हा अखिल भारतीय साहित्य संमेलने गाजवणारा कार्यक्रम त्यानं या संमेलनात ठेवला होता. सूत्रसंचालनाच्या निमित्तानं मीही त्यात सहभागी झालो होतो. एकदा त्यानं या तांड्यावर आकाशवाणीचं कवी संमेलन घेतलं. शिवाय शिवाजीच्या ओळखीनं जवळच्या रस्त्यावरून जाणारे येणारे कितीतरी लेखक, कवी शिवाजीनं आपल्या मुलांसमोर आणले. कधी कधी शिवाजीला भेटायला म्हणून आलेल्या लेखक कवींना शिवाजीनं लगेच आपल्या शांतीवनसारख्या उघड्या विद्यापीठाच्या शाळेत ते लेखक, कवी पोरांसमोर उभे केले. कधी झाडाखाली तर कधी उघड्यावर. मीही अनेकदा शिवाजीच्या या उपक्रमात सहभागी झालो आणि तिथल्या भटक्या, विमुक्त, आदिवासी मुलांशी संवाद साधला. शिवाजीमूळं ती मुलं किती सखोल वाचन करत होती, हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं. त्यानं राबवलेल्या वाचनउपक्रमातून कितीतरी मुलं घडली, लिहिती-वाचती झाली. ती संस्था चालवणारे किशनराव आणि गोविंदराव हे दोघेही राठोड बंधू पक्के साहित्यप्रेमी होऊन गेले.
या विविध भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या पोरांना शिकवायचं म्हणजे मोठी अवघड गोष्ट. आधी मुळात शिकवणाऱ्याला त्यांच्या भाषेतले काही शब्द समजून घेऊन त्यांच्या भाषेत बोललं तर ते जास्त कळतं. ते तर शिवाजीनं केलंच पण अभ्यासक्रमातल्या अनेक मराठी कविता त्यानं या मुलांकडून त्यांच्या त्यांच्या बोलीत अनुवादित करून घेतल्या. माझी बाप कविता अभ्यासक्रमाला होती तेव्हा त्यानं या अशा भटक्या विमुक्तांच्या २१ बोलींमधून अनुवादित केरून घेतली. नंतर समाजमाध्यमावर खूप दिवस ती फिरली. तेव्हा माझ्याकडं मोबाईलही नव्हता. मला लोक दाखवायचे. नंतर वृत्तपत्र आणि नियतकालिकातूनही शिवाजीच्या या उपक्रमाची सर्वांनीच दखल घेतली.
शिवाजी स्वतः उत्तम वाचक आहे. नेमकं आणि अभिजात ते सगळं त्यानं वाचलेलं असतं. त्याच्याशी बोलताना हे आपल्या सहज लक्षात येतं. त्याच्याकडं गेलं म्हणजे एखादं दुर्मिळ पुस्तक हमखास भेट मिळायचं. एकदा त्यानं दि. बा. मोकाशी यांनी कामसूत्रचे लेखक महर्षी वात्सायन यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी मला भेट दिली होती. मोकाशी यांच्या इतर सर्व पुस्तकांची मला माहिती होती पण या पुस्तकाविषयी काहीच माहित नव्हतं. ते पुस्तक मला कुठं दुकान वा प्रदर्शनात कधी दिसलंही नव्हतं. एवढं वाचन करणारा आणि सतत पुस्तकाच्या शोधात असलेला मी, पण मला ते पुस्तक कुठंच सापडलं नाही. नेमकं एकदा शिवाजीनं मला ते भेट दिलं आणि मला कितीतरी आनंद झाला. पुस्तक भेटीचा असा सुखद आनंद त्यानं प्रत्येकच वेळी दिलेला आहे.
वाचनासारखाच शिवाजीला छायाचित्रकलेचाही खूप नाद आहे. त्याच्या गावचे बरेच लोक या कलेत माहीर आहेत. सदा वडजे हे त्यापैकीच एक. शिवाजीही त्यात बऱ्यापैकी मुरलेला आहे. त्याच्याकडं कधी कार्यक्रमासाठी गेलो की, हमखास काही खास फोटो काढतो आणि मग काढलेले फोटो तो पाठवतच असतो. पूर्वी प्रिंट करून पोस्टानं पाठवायचा. आता ते सोपं झालं आहे. लगेच मोबाईलवर पाठवता येतात. असे कितीतरी सुंदर फोटो त्यानं मला पाठवलेले आहेत.
शिवाजीला नाटकात रस होता. सुरुवातीच्या काळात त्यानं नाट्यलेखन केलं. मुलांना घेऊन अनेक नाटकं बसवली. उमेदीच्या काळातच त्याच्या नाटकाला राज्य शासनाचेही पुरस्कार मिळाले. त्यामुळे या क्षेत्रात तो खूप पुढं जाईल असं वाटलं होतं. पण अचानक त्यानं ते सगळं थांबवलं. शिवाजीनं प्रत्येक वेळी असंच केलेलं आहे. हे अर्थात त्याच्या स्वतःच्या लेखनासंबंधी, शाळेसंबंधी मात्र त्याने प्रत्येक गोष्ट शेवटला नेली. स्वतःच्या लेखनाचं मात्र त्यानं तसं केलं नाही. नाट्यलेखनात वाढेल वाटलं तर तो अचानक थांबला. कविता छान लिहायचा. त्याच्या मागून आलेल्या लुंग्या-सुंग्यांनी संग्रह काढून पुरस्कार मिळवले. शिवाजीला अनेकदा आठवण करून दिली, अरे कविता संग्रहाचं काय केलंस ? पण शेवटपर्यंत त्यानं काहीच केलं नाही. मध्यंतरी त्यानं ललितगद्य लिहिलं. ‘मुराळी’मधून राजन गवस यांनी आवर्जून ते ललितगद्याचे तुकडे छापले. वाचून मी भारावून गेलो. ते सगळं गयानंही वाचलं. शिवाजीला फोन करून, भरपूर लिही, निदान याचं तरी पुस्तक होऊ दे, असं म्हणालो. माझ्यासोबत गयाही त्याला फोनवर बोलली. पण तेही त्यानं मध्येच सोडून दिलं. कदाचित प्रामाणिक नोकरी करण्यामध्ये भरपूर वेळ जात असावा आणि शिवाजी त्याला प्राधान्य देत असावा. त्यानं कायमच विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला, त्यांच्या प्रसिद्धीला, त्यांना मोठं करण्याला वेळ दिला आणि स्वतःच्या लेखनाकडं, स्वतःच्या लेखनाच्या प्रकाशानाकडं कायमच दुर्लक्ष केलं. असा हा शिवाजी आता निवृत्त होतो आहे. आता त्याच्या पाठीमागचे नियत कर्तव्य संपलेले आहे. आता तरी त्यानं आपल्या कविता आणि ललितगद्य समोर घेऊन बसावं. पाहिजे तर त्याचं पुनर्लेखन करावं, पाहिजे तर थोरामोठ्यांशी चर्चा करावी. पण पुस्तकं करायला घ्यावीत, असं मला त्याला आवर्जून सुचवावसं वाटतं.
शिवाजीमुळे मी अनेकदा मुखेड परिसरात गेलो. कमळेवाडीला तर गेलोच गेलो पण कोडग्याळच्या शैक्षणिक संकुलातही गेलो आणि मुखेड गावातही गेलो. किशनराव राठोड साहेबांच्या मुखेड गावातल्या मुलींच्या शाळेत एकदा मला आणि गुरुवर्य रा. रं. बोराडे सरांना शिवाजीनं बोलावलं होतं. किशनरावही तेव्हा आवर्जून कार्यक्रमासाठी थांबलेले होते. खूप मजा आली. संध्याकाळी तिथल्या अतिथीगृहात सामूहिक भोजनाला तर आणखीच मजा आली. तेव्हा रा. रं. बोराडे सर परभणीत प्राचार्य होते. त्यामुळे आम्ही दोघे सोबतच गेलो आणि येतानाही सोबतच आलो. एकदा गावातल्या चौधरी बंधूंनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू केली होती. त्या व्याख्यानमालेतही शिवाजीनं आवर्जून मला बोलावलं. सुदैवानं ते लोक चांगले असल्यामुळे त्यांनी शिवाजीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ती एकूण व्याख्यानमलाच खूप उठावदार झाली होती. त्या व्याख्यानमालेचं नियोजन आयोजन खूपच श्रीमंती थाटात झालं होतं. अख्खं मुखेड त्या व्याख्यानमालेसाठी ओसंडून उपस्थित होतं. त्यामुळे मुखेड आणि मुखेड परिसराला अधिकाधिक सुसंस्कृत करण्यासाठी शिवाजीनं नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. एकदा तिथल्या शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमासाठी देखील त्यानं मला आवर्जून बोलावलेलं होतं. मुखेडसारख्या ठिकाणी सभागृह नसल्यामुळे तिथल्या चित्रपटगृहातच हा कार्यक्रम झाल्याचंही मला आठवतं. बोलावलेल्या पाहुण्याला तो इतका जीव लावतो की तो पाहुणा भारावूनच जातो. याचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. कधी कधी वाटतं आपण या प्रेमाला पात्र आहोत का ? पण शिवाजी प्रत्येकावर मनातून प्रेम करत राहतो.
मी जिंतूरला होतो तेव्हा जाहीर कार्यक्रमातून कुणीतरी, इंद्रजितला जिंतूरहून बदली करून परभणीला न्यायला पाहिजे, असं सांगितलं. तेव्हा जिंतूरचे एक सजग नागरिक म्हणाले, ‘सरांना त्रास होत असेल हे खरंच आहे, त्यांचा त्रास कमी व्हावा हेही खरंच आहे, पण आमच्या जिंतूरला सुसंस्कृत करण्यासाठी सरांनी थोडा त्रास घेऊन इथःच राहावं अशी आमची इच्छा आहे’. हे शिवाजीच्या संदर्भात मला आवर्जून आठवलं. कारण नंतर स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे त्याला नांदेडला राहावं लागलं. तिथून जाणं-येणं लांब पडायचं. पण शिवाजीनं तेही केलं. जाणून-बुजून जवळ कुठं बदली करण्याचा प्रयत्न केला नाही. संस्था बदली करेल तिथं नोकरी करणं आणि समोर जे काम असेल ते प्रामाणिकपणे करणं, हे शिवाजीनं आयुष्यभर केलं. असे प्रामाणिक शिक्षक आता कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे शिवाजीच्या निवृत्तीने खरंच मोठी पोकळी निर्माण होणार आहे. पण अर्थातच त्याचा आदर्श घेऊन मुलं पुढं येतील आणि त्या जागा भरून काढतील याची मला खात्री आहे. कारण मुलं शिकवून शिवाजीनं संस्कारीत केलेली आहेतच.
मुखेड आणि परिसर म्हणजे सगळा डोंगराळ भाग आहे. या संपूर्ण डोंगरात खास डोंगरी सीताफळं फारच चांगली पिकतात. डोंगरातली ही सीताफळं सकाळी उठून, जमा करून, डालीच्या डाली घेऊन इथले आदिवासी लोक रस्त्यावर विकायला बसलेले असतात. सीताफळ हे माझं अत्यंत आवडीचं फळ. एकदा शिवाजीच्या घरी त्यानं सीताफळं समोर ठेवल्यावर मी इतक्या आवडीनं खाल्ली की, त्याच्या लक्षात आलं, सरांना सीताफळ फार आवडतं. कार्यक्रम संपवून घरी आलो तर ड्रायव्हरनं सांगितलं, सर डिक्कीत सीताफळाची डाल ठेवलेली आहे. म्हटलं, कुणी ठेवली ? ते म्हणले आपल्या कार्यक्रमाचे जे संयोजक होते शिवाजी अंबुलगेकर सर, त्यांनी ठेवली. म्हटलं, कधी ठेवली ? ते म्हणाले, तुम्ही कुठेतरी गुंतलेले असताना त्यांनी अचानक आणून ती मागे ठेवली. म्हणजे मला कळूही न देता, मला आवडतात म्हणून अख्खी डालभर सीताफळं त्यानं माझ्या गाडीत टाकलेली होती. शिवाजीचा स्वभाव मुळात या डोंगरी सीताफळांसारखाच आहे. अतिशय मधाळ आणि गोड. मुखेडच्या रानातलं अस्सल डोंगरी मधाळ आणि गोड सीताफळ म्हणजे शिवाजी. निवृत्तीनिमित्त शिवाजीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
💐 इंद्रजित भालेराव यांच्या fb wall वरून साभार







