
कंधार, दि. १ सप्टेंबर :
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र, कंधार यांच्या वतीने कंधार पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्माकुमारी ज्योती बहिणींनी रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. राखी हा केवळ बंधुभावाचा धागा नसून, स्वतःच्या विकारांपासून व व्यसनांपासून मुक्त होण्याचा आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सदाचारी जीवन जगावे, तसेच इतरांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डीवायएसपी सुशील जमाडे सर, पीआय सदाशिव भडीकर सर, एपीआय राम सर, तसेच इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांना तिलक लावून राखी बांधण्यात आली. त्यानंतर प्रत्येकाला ईश्वरीय संदेश, वरदान व प्रसाद देण्यात आला. व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा केली आणि स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच समाजालाही व्यसनमुक्त करण्याचा दृढ संकल्प केला.
याप्रसंगी डीवायएसपी सुशील जमाडे सर यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली व अशा उपक्रमांचे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थितांना मनापासून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करून ती आपल्या जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रत्येकाने “स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी सदैव कर्तव्यदक्ष राहू” असा विश्वासाचा धागा बांधण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमार सतीश भाई, चंद्रकला निकम माता, सौ उज्वला ताई गुरसुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पत्रकार उज्वला ताई गुरसुडकर यांनीही उपस्थित पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पीआय सदाशिव भडीकर सर यांनी केले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व महिला कर्मचारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.






