
कंधार प्रतिनिधी :
बहाद्दरपुरा येथे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माजी सरपंच तथा प्रशासक सुमनबाई खरात यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात संपन्न झाली. यावेळी संपर्कप्रमुख म्हणुन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पानभोसीचे केंद्रप्रमुख पी. एस. मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामसभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ग्रामपंचायत अधिकारी राज्य संघटनेने विविध कारणास्तव व जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी श्री पी . एन. पाटील यांचा ग्राम सभा चालू असताना दुर्दैवी निधन झाल्या कारणाने ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामसभा नियमितपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र कदम (लिपिक) यांच्याकडे सचिवपदाची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रशासक तथा माजी सरपंच सुमनबाई खरात यांनी शासकीय नियम व प्रशासकीय प्रक्रियेचे पालन करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.
ग्रामसभेची सुरुवात ‘#वंदे मातरम् गीताने करण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण – आवास प्लस २०२४ सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीचे वाचन करण्यात आले व यादीतील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली तसेच मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सचिवपदाची तात्पुरती धुरा सांभाळणारे ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र कदम यांनी सभेतील विषयांचे प्रभावीपणे सादरीकरण केले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी ग्रामसभेचे कामकाज शिस्तबद्ध व सुरळीतपणे पार पाडले.
प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडल्याबद्दल प्रशासक, ग्रामपंचायत प्रशासकीय समितीचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांनी रविंद्र कदम यांचे विशेष कौतुक केले.या ग्रामसभेस ग्रामपंचायत प्रशासकीय समिती सदस्य चंद्रकांत पेठकर, भीमराव कदम, प्रशासकीय समिती सदस्या कल्पनाताई पेठकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने ग्रामसभेची सांगता करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.





