
कंधार : प्रतिनिधी
भरती मोठ्या प्रमाणात सरल पोर्टलच्या माध्यमातून होत असल्याने शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांचा डी.एड.शिक्षणाकडे कल वाढत आहे.बदलत्या शैक्षणिक प्रवाहासोबत विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. शिक्षणात दर्जा, सातत्यपूर्ण मेहनत,परिश्रम आणि योग्य नियोजन यांची सांगड घालून नवीन बदल स्विकारावे असेच विद्यार्थी भविष्यात यशस्वी होतील, असे प्रतिपादन प्राचार्य संजय नागरगोजे यांनी केले.
महात्मा फुले ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी.एड.कॉलेज अध्यापक विद्यालय,कंधार येथे विद्यार्थी-पालक बैठक मेळावा व अध्यापक विद्यालयाच्या नवीन सत्राचा शुभारंभ कार्यक्रम बुधवार,दि.१६ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. यावेळी प्राचार्य संजय नागरगोजे मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत मस्के माळाकोळीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला प्रबोधनकार कृष्णामाई इंगळे, दिगांबर वाघमारे, धान फाउंडेशनचे वैभव चव्हाण, विजय सातापुरे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी बालाजी धर्मकर, रेखा जाधव व मारोती भुजबळ यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
प्राचार्य नागरगोजे पुढे म्हणाले की, शिक्षक क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र मिळविण्यापुरते शिक्षण न घेता ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, संवादकौशल्य आणि अध्यापनातील नवनवीन पद्धती आत्मसात कराव्यात. स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच चांगल्या संधी उपलब्ध होतील. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे सातत्याने लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी-पालक बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच उपस्थिती, अभ्यासातील सातत्य, आगामी शिक्षक भरतीच्या संधी आणि बदलत्या शिक्षण पद्धतींबाबत चर्चा करण्यात आली. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील समन्वयातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षक घडू शकतात, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.






