हिंगोली/ प्रतिनिधी
दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी मराठी विभाग आदर्श महाविद्यालय, हिंगोली व कै. पुष्पादेवी पाटील महाविद्यालय, रिसोड यांच्यातील सामंजस्य करारा-अंतर्गत ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विद्रोह’ या विषयावर प्रा. डॉ.केशव कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विलास आघाव होते, तसेच विचार मंचावर महाविद्यालयातील MOU व प्लेसमेंट सेलचे संयोजक प्रा. डॉ.आशिष गट्टानी, लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ.दयाराम मस्के तर व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. केशव कोकाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषा- साहित्य यातील साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ् मयावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाचे महत्त्व प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी विशद केले. व्याख्याते केशव कोकाटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा संपूर्ण पट उलगडत केवळ दीड दिवस शाळा शिकणाऱ्या फकीरा, वारणेचा वाघ, रानबोका, वैजयंता या अजरामर कादंबऱ्यांसह कथा, प्रवासवर्णन,लावणी, पोवाडा, लोकनाट्य या अण्णाभाऊंनी लीलया हाताळलेल्या साहित्य प्रकाराचे विशेष स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील विविध पैलूंवर भाष्य करत विद्यार्थ्यांना अभ्यास, अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास डॉ.प्रभाकर शिंदे प्रा. विशाल गायकवाड यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश लेकुळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.महेश मंगनाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मारोती कोल्हे, डॉ.लक्ष्मण सोळंके, प्रा. गजानन डुडुळे यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

