कंधार( दिगांबर वाघमारे )
समरसता, साहित्य आणि सामाजिक ऐक्याची अखंड ज्योत पेटवणारे, लातूरचे सुपुत्र व लोकप्रिय माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा नुकताच समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने गौरव झाला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या साहित्य साधनेला आणि समाजमनाशी जुळलेल्या संवेदनशील विचारांना मिळालेलं एक भावनिक दादपत्र ठरलं आहे.या निमित्ताने कंधारचे ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद आगबोटे यांनी डॉ. गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांच्या उज्ज्वल साहित्यिक व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी इंजि. रवी आगबोटे आणि युवा समाजसेवक सारंग वाघमारे हेही उपस्थित होते.
सत्काराचा प्रसंग हा केवळ औपचारिक नव्हता, तर तो साहित्यिक नाळ आणि सामाजिक समरसतेच्या भावबंधांचा एक हृदयस्पर्शी सोहळा ठरला. प्रल्हाद आगबोटे यांनी डॉ. गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटलं – “डॉ. गायकवाड यांची लेखणी ही समाजातील पीडित, वंचित आणि कष्टकऱ्यांच्या आशा-आकांक्षा व्यक्त करणारी आहे. त्यांच्या विचारांना पुरस्कार मिळणं म्हणजे महाराष्ट्राच्या लोकशाही मनाला सन्मान मिळणं होय.”
साहित्याच्या माध्यमातून समाजमनाशी नाळ जुळवणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान हा समाजाच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि समरसतेच्या चिरंतन प्रवाहाला दिशा देणारा ठरतो.
डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा हा गौरव, म्हणजेच मराठवाड्याच्या साहित्य-भूमीचा आणि सामाजिक विचारधारेचा सन्मान आहे

