प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे. ‘मोदीज मिशन’ या पुस्तकात त्यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे. समाजातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला हेच भारताच्या आकांक्षांचे केंद्र त्यांनी मानले. या चार घटकांच्या उन्नतीतच विकसित भारताचा पाया असून ‘मोदीज मिशन’ पुस्तक भारताच्या विकासगाथेचा आरसा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री “नरेंद्र मोदी हे फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत, तर देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. त्यांच्या कामगिरीचा प्रवास संघर्षमय असून, तो प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. मोदींच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती एका पुस्तकात सामावणे शक्य नाही, कारण त्यांनी अशक्याला शक्य करून दाखवले आहे. मागील अकरा वर्षांत भारतात झालेले सकारात्मक बदल जगभरात कौतुकास्पद ठरले आहेत, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

