
कोत्तावार ऑईल मिलसमोरील गल्ली रात्रीच्या वेळी बनते अंधारमय; चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ग्रामस्थांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
मुखेड :(दादाराव आगलावे)
मुखेड शहराला लागून असलेल्या परंतु उमरदरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दीपनगर परिसरातील नागरिक गेल्या एक वर्षापासून अंधारात जीवन जगत आहेत. परिसरातील पथदिवे बंद असून, रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कोत्तावार ऑईल मिलसमोरील गल्ली पूर्णपणे अंधारात राहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षभरापासून पथदिव्यांची समस्या कायम असतानाही संबंधित ग्रामप्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप दीपनगर भागातील ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढल्या असून, मागील वर्षभरात तब्बल चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पथदिव्यांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी दीपनगर परिसरातील रस्ते व गल्लीबोळांमध्ये आवश्यक ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत, तसेच बंद असलेले दिवे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
मात्र, एक वर्ष उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच कामानिमित्त बाहेरून घरी परतणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत ग्रामसेवकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामात बोगसगिरी झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य, अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे की नाही, तसेच कामासाठी खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाच्या निधीचा गैरवापर झाला असल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून दीपनगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत परिसरातील पथदिव्यांची समस्या तातडीने सोडवावी, मागील दोन वर्षांत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चोरीच्या घटना घडल्यानंतरही परिसरात प्रकाशाची व्यवस्था केली जात नसेल, तर प्रशासन आणखी किती घटनांची वाट पाहणार? असा संतप्त सवाल दीपनगर येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड तसेच संबंधित पंचायत प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते आणि दीपनगर परिसरातील अंधार दूर करण्यासाठी तसेच कथित रस्ते कामांची चौकशी करण्यासाठी कोणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





