
समाजातील लोकांना त्यांच्या गरजाची, न्याय हक्काची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समाजात जनजागृती आवश्यक आहे. सामाजिक बदलासाठी व्यक्तीअनेक प्रकारे प्रयत्न करू शकतात. एखादी सामान्य व्यक्ती जबरदस्त इच्छाशक्तीने किंवा ध्येयाने प्रेरित होऊन आणि कठोर परिश्रमाने त्यांच्या परिसरात किंवा देशात महत्त्वाचा बदल घडवून आणू शकतात. त्यांना क्रांतीकारक म्हणतात. आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन त्या निमित्ताने आपण मंगल पांडे,वसुदेव फडके,उमाजी नाईक, क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव ,राजगुरू,झाशी की राणी लक्ष्मीबाई, अनंत गणेश पिंगळे, सरदार उद्धव सिंग, तात्या टोपे, चाफेकर बंधू, क्रांतिसिंह नाना पाटील, आद्य गुरु लहुजी साळवे, चंद्रशेखर आझाद ,कल्पना दत्त अशा महान क्रांतिकारकांना मानाचा मुजरा.. इंग्रजांनी भारतीयांचे आर्थिक, सामाजिक शोषण केले.अन्याय, अत्याचार जुलूम इत्यादी सहन करणे भारतीयांच्या दृष्टीने नित्याचेच बनले होते. मात्र सहनशीलतेला देखील मर्यादा असते. असे म्हटले जाते की.
*आलेलं दुःख पचवलं की,जगण्याची उमेद भेटते*,
*जिथे झाडाला घाव घातला जातो, तिथेच नवी पालवी फुटते* *इंग्रजांनी भारतीयांच्या स्वाभिमानावरती घाव घातला अन् त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात क्रांतीची नव पालवी फुटली. ती क्रांती १८५७ पासून सुरू झाली.
खरोखरच ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या देशाची सेवा केली. आपला आवाज इंग्रजांना ऐकण्यासाठी बॉम्ब हल्ले केले. त्यांचा स्मरण करणे आपला आद्य कर्तव्य आहे. म्हणून रणावीना स्वातंत्र्य कोणा मिळाले.
असे आपणास म्हणता येते. स्वतःचे सामर्थ्य निर्माण करावी लागते. स्वतः उन्हात उभे राहून इतरांना सावली द्यावी लागते. तेव्हाच आपल्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. दुसऱ्याला आपण सांगताना स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो. दुसऱ्या व्यक्तीमध्ये जो बदल करायचा आहे.तो बदल आधी स्वतःमध्ये करून तो आचरणात आणावा लागतो. तेव्हाच आपण तावून-सुलाखून निघतो. आणि समाज आपणाला स्वीकारतो.
वरील क्रांतिकारकांनी हे सर्व केले. म्हणूनच ते आज पूज्यनीय झाले आहेत.*जे देशासाठी लढले*|
*ते अमर हुतात्मे झाले||*
*झगडली झुंजली जनता*|
*मग स्वातंत्र झाली माता||*.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वतःचे बलिदान दिले.
हे बलिदान वाया जाता कामा नये. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता. हातात तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढले ,वंदे मातरम् च्या घोषणा दिल्या, त्यांचे बलिदान कधी वाया जाऊ नये. या गोळीबारात शिरीष कुमार ,लालदास, धनसलाल शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालिया टॅंक मैदानावर चले जाव चा नारा दुमदुमला.प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधीजींनी ‘करा किंवा मरा’ हा मूलमंत्र भारतवासीयांना दिला. तेव्हापासून सर्व भारतीय एकत्रित झाले. आणि स्वाभिमानाने हा लढा यशस्वी करून दाखवला.
आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छोडो भारतचा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर केला. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जन आंदोलनाला सुरुवात झाली. संतप्त जनतेने जागोजागी इंग्रजांच्या विरोधात मिरवणुका काढल्या.पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले केले. तरी लोक घाबरले नाहीत.इंग्रजांच्या दडपशाचे प्रतीक तुरुंग होते. पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके या ठिकाणी आंदोलकांनी हल्ले करून आपला रोष दाखवून दिला. सरकारी कचेरी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले.महाराष्ट्रात आष्टी ,यावली ,महाड चिमूर, गारगोटी अनेक ठिकाणी आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे इतिहासात अविस्मरणीय ठरले. याच काळात भूमिगत चळवळी सुरू झाल्या. १९४२ च्या अखेरीस जन आंदोलनाला फार मोठे वळण लागले आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी कार्यकर्त्याकडे आले.समाजवादी कार्यकर्त्यांनी जन आंदोलनात सहभाग घेतला. जय प्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक , अच्युत तराव पटवर्धन, वसंतदादा पाटील, उषा मेहता या सर्वांनी मिळून रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उध्वस्त करणे. दळणवळण यंत्रणा विस्कळीत करणे, असे कार्यक्रम सुरू केले. त्यामुळे इंग्रजांना पळती भुई थोडी झाली. क्रांतीसिंह नाना पाटलांनी सावकार शाहीला विरोध केला. दारूबंदी, साक्षरता प्रसार ,जातीभेद निर्मूलन असे अनेक विधायक कामे केली. स्वतः त्यांनी न्यायनिवाडा केला. त्यामुळे इंग्रजांना आता इथे थांबणे शक्य नव्हते. त्यांनी प्रतिसरकारची निर्मिती केल्यामुळे इंग्रजांनी धास्ती घेतली.सातारा येथे प्रतिसरकार निर्माण करून नाना पाटलांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले. संत तुकडोजी महाराजांनी याच काळात राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन स्फूर्तीदायी वातावरण निर्माण केले. आदर्श गुरू साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रभक्तीपर गीतावर आंदोलकाच्या मनात उत्साह निर्माण केला. या आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात. याच काळात भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळण्यास आणखी मदत झाली. नेताजी सुभाष चंद्र बोसनी लोकांना *तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा* हे मूलमंत्र दिले.त्यांच्या आझाद हिंद सेनेचा पराक्रम भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी अतिशय उपयुक्त ठरला. १९४२ च्या लढ्याने प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे रोवली.
आज भारतीयांच्या मनामध्ये या आंदोलनाबद्दल खूप स्वाभिमान आहे. इंग्रजांनी यानंतर आपले बस्तान हलविले आणि सरळ चालते झाले. सध्याच्या काळामध्ये आपल्याच देशाच्या विरोधात आपल्याला जाण्याची वेळ आली.
हे चांगले नाही.
आपले हक्क आपले अधिकार मागण्यासाठी आपल्याला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन कराव लागते. ही गोष्ट भूषणावह नाही. आपापसामध्ये वाद निर्माण करून क्रांती होत आहे.क्रांती म्हणजे बदल होय. रशियन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती जगात होऊन गेल्या. कारण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी जनतेवर जुलूम अन्याय केले होते. १६ वा लुई हा जनतेसाठी हुकूमशाह होता. त्यांनी जनतेला त्रास दिला. त्यामुळे लोकांनी त्याला गिलोटींच्या यंत्रावर चढवले आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे मेरीला ठार मारले.अशी वेळ का येते? ज्यावेळेस अन्यायाच्या विरोधात लढाई लढली जाते. त्यावेळेस त्या लढाईला यश येते. क्रांती दिनाच्या निमित्ताने आपणास असे सांगता येते की, मानवतावादी विचार असणारं सरकार अस्तित्वात असावे.
प्रत्येक मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे असा जाहीरनामा अमेरिकेतून थॉमस जेफरसन यांनी काढला. तेव्हा तिथे लोकांना स्वातंत्र्य मिळाले. ध्येयवेडे लोकच इतिहास घडवतात.असे म्हटले जाते आपल्या पराक्रमाने कर्तृत्वाने ज्या लोकांनी इतिहास घडवला.
त्या असामान्य व्यक्तीचे स्मरण व्हावे.त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नवीन पिढीला व्हावी. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी.
व त्यांच्यासारखे असामान्य कार्य नवीन पिढीच्या हातून घडले जावे. पारतंत्र्याच्या जुलमी गुलामगिरीतून आपल्याला भारत मातेच्या स्वातंत्र्यकरिता प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीकारकांचा आदर्श आपण घ्यावा व त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची मधूर फळे चाखताना त्यांच्या पराक्रमाचे गोडवे या पुढील पिढीने गावावेत. म्हणूनच ऑगस्ट क्रांती दिन साजरा करावा लागतो. त्यामुळे देशामध्ये चैतन्याची लाट निर्माण होते. *हा देश माझा याचे भान जराशी राहू द्या रे* म्हणूनच म्हटले जाते.
हा भारत एक संघ राहण्यासाठी सर्वांना आपण एका झेंड्याखाली येणे अतिशय महत्त्वाचे आहे.सध्या अनेक लोकांनी आपल्याच लोकांमध्ये वाद विवाद निर्माण केले आहेत. ‘फोडा आणि राज्य करा’ या पद्धतीने सध्या वातावरण निर्माण होत आहे. दहशतवाद, वसाहतवाद, प्रांतवाद, जातीयता, अस्पृश्यता ,आरक्षण अशा अनेक विषयावर सध्या भेदाभेद निर्माण करून लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण केले जात आहे.
त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता हा शब्द काही काळापुरता चांगला वाटत आहे. सध्या स्वातंत्र्य आहे कोणाला? प्रत्येक माणूस निराश होताना दिसतो. लोकशाहीमध्ये सर्व लोक आनंदी असावेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे लोकशाहीनी दिली आहेत.
लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेली शासन म्हणजे लोकशाही होय. सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे.
क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सांगू शकतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वाभिमानाने या देशात जीवन जगू शकत नाही. तोपर्यंत त्याच्यावर अन्याय होत राहणार आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आजच्या तरुणांनी जीवन जगावे. खूळचट कल्पना, अंधश्रद्धा यांच्या नादी लागू नये. तेव्हा आजचा तरुण चांगलं जीवन जगेल. न्याय हक्कासाठी लढेल, आपले हक्क आणि अधिकार जर आपल्या पासून हिरावून घेत असतील तर स्वतंत्र देशात राहून आपला उपयोग काय?असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशाची लोकसंख्या आज १४३ कोटीपेक्षा जास्त झाली. हे सरकारी आकडे सांगतात. जीवनामध्ये बदल करायचा असेल तर अनेक गोष्टी पासून आपणाला दूर राहावे लागेल .बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता या गोष्टीत बदल करावा लागेल. त्या सोडून द्याव्या लागतील तरच आपण आपल्या देशात सुखाने जीवन जगू, क्रांती अगोदर मनात येते. नंतर समाजामध्ये पसरली जाते.मन आणि समाज एकत्र झाल्यानंतर खरोखर ९ ऑगस्ट क्रांतीमुळे आपण सगळे एकत्रित झालो. इंग्रजांना या ठिकाणाहून आपला देश सोडून निघून जावे लागले. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेनेने महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसरे महायुद्ध हे संहारक होते. त्यामुळे इंग्रजांची भारतावरील पकड ढिल्ली झाली. आणि भारत स्वातंत्र्याच्या जवळ आला. तरी इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नियतीचा अवलंब करून भारत आणि पाकिस्तान असे दोन राज्य निर्माण केले. कायमस्वरूपी वाद लावून निघून गेले. तरी आपण समजूतदारपणाने आज भारत माता की जय म्हणून आपण जीवन जगत आहोत. शांतिदूत पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेजारील देशावर आपले प्रेम दाखवले आहे. चीन बरोबर अनाक्रमणाचा करार केला होता. अलिप्तवादी संघटनेमध्ये आपण होतो.तरीही शेजारील राष्ट्रांनी आपल्याला दगा दिला.
हे विसरून चालणार नाही.
ऑगस्ट क्रांतीच्या निमित्ताने बलिदान दिलेल्या सर्व वीरांना विठू माऊली प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन..*प्रा. बरसमवाड विठ्ठल लक्ष्मीबाई गणपतराव*
*गोकुळवाडी मुखेड*






