मुखेड: (दादाराव आगलावे )
तालुक्यात बेरळी बुद्रुक, खुर्द, वर्ताळा सावरगाव (पि.), जांब, हिप्परगा, बाराळी, मुक्रामाबाद आधी भागामध्ये सर्वसाधारण परंतु पेरण्याजोगा पाऊस झाल्याने मागील आठवडाभरात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे व ज्यांची पेरणी राहिलेली होती अशां शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे.
7 जून च्या अगोदर दमदार पाऊस तालुका भर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र निघताच पेरणी केली. काहींनी मात्र पंजाबराव डक यांच्या आदेशाचे पालन करून त्यांनी पेरणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांनी आपला डाव फसला असे म्हणत वरून राजाकडे सर्व लक्ष एकवटले परंतु वरून राजाने डोळे वटारल्यामुळे पंधरा दिवस कुठेही पाण्याचा थेंब पडला नाही परंतु दिनांक 25 व 26 रोजी बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीस सुरुवात केली तर अगोदर पेरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस उगवले नसल्याची तक्रार आहे. यंदा सोयाबीन व कापसाची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. ज्वारी, मुग हे अल्प प्रमाणात पेरणी केल्याचे शेतकऱ्यात बोलले जाते.
शासनाने शेतकऱ्यास मदत द्यावी
-बळी पाटील जोगदंडपावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट मदत द्यावी अशी अपेक्षा दापका राजा येथील शेतकरी बळी पाटील जोगदंड यांनी केली आहे.

