फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
स्मशानभूमी माझे नाव , अंतिम समयी कुशीत घेतेय सारा गाव.. होय आजपर्यंत मी कधीच कसलाही भेदभाव केलाच नाही. ना जात-पात पाहिली ना धर्म-पंथ , लहान असो की थोर , गरीब असो की श्रीमंत , महिला असो की पुरुष. ना घातला घाट ना फिरवली पाठ. तरीपण आजही मी दुर्लक्षितच का.? माझी गरज सगळ्यांना पण माझ्याकडेच कोणीही लक्ष देईना. होय मी आता प्रकाशमान झालेय पण दैदिप्यमान कधी होणार..?
नुकतेच फुलवळ ता.कंधार येथील स्मशानभूमीत सौर ऊर्जेचे दोन पथदिवे बसवण्यात आले असल्याने नक्कीच रात्री-बेरात्री च्या अंत्यसंस्कारवेळी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे यात वादच नाही. पण जसेही माझी स्थापना झाली आणि स्मशानभूमी म्हणून नामकरण झाले तेंव्हा पासून आजपर्यंत ही माझ्याकडे स्मशानघाट , हारवड , मसनवटा अशा नावांनी संबोधून स्मशान शांततेच ठिकाण म्हणून माझी ओळख निर्माण केली. परंतु गावाच्या व जणमाणसाच्या तुलनेत व्हावा तसा माझा अद्यापही विकास झालाच नाही. नव्हे नव्हे तुम्ही संधी साधू माणसांनी तो विकास केलाच नाही.
कित्येक पिढ्या आल्या आणि गेल्या , इथून पुढे येतीलही पण माझी आकांत अजूनतरी कोणाच्या कानावर किंवा जिव्हारी पडत नाही याचेच नवल वाटते. माझ्या नावावर कित्येकांनी स्वतःच्या पोटाची खळगीही भरली पण कोणी विचार ही केला नाही की आपलाही शेवटचा प्रवास इथपर्यंत येऊन इथेच थांबणार आहे तर मग ही एवढी हाव कशासाठी..? मी माझी व्यथा मांडण्या मागची किंवा तुम्हाला सांगण्या मागची एवढीच तळमळ आहे की शेवटी माझ्याच कुशीत यायचे आहे तर मग माझ्याच नावावर प्रपंचाचा एवढा घाट का घातला जातोय..?
आजपर्यंत माझ्या नावावर ( स्मशानभूमी ) विविध योजना राबवत शासनाच्या विविध फंडातून लाखो रुपयांचा शासकीय निधी मंजूर , उपलब्ध करून घ्यायचा आणि त्याची अशी तशीच विल्हेवाट लावून तो पैसा गिळंकृत करायचा. जसे की.. आजपर्यंत शेड असेल , सरंक्षण भिंत असेल , पाणीपुरवठा असेल , वृक्षारोपण असेल , विद्युत रोषणाई असेल , आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या असतील , रंगरंगोटी असेल किंवा अन्य कोणत्याही सोयीसुविधा असतील त्यासाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध करून घेतला पण तो योग्य मार्गाने खर्च न करताच तो हडप केला गेला त्यामुळेच मी आजही विकासापासून कोसोदूर असून वंचितच आहे याचे मनोमन दुःख होतेय. अरे अजून किती असेच करणार..? याला नेमकं जबाबदार तरी कोण..? हे मी अजून किती दिवस सहन करायचे..?
जिथे जिथे विकासाची कामे होतात तिथे तिथे मात्र प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने बारकाईने लक्ष देतो आणि संबंधित ठेकेदार असो का अधिकारी यांना वेळोवेळी जाब विचारात असतात पण माझ्याकडे सर्वांचेच असे दुर्लक्ष का..? असा प्रश्न मला नेहमीच सतावतो आहे . तेंव्हा मी जसे कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला सामावून घेऊन समानेतेने वागते तसेच यापुढे तरी आपण सर्वांनी माझ्या व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देत जेंव्हा जेंव्हा माझ्या नावावर विकास निधी मंजूर करून आणला जाईल तेंव्हा मात्र संबंधितांना जाब विचारत कामे करून घेतली तर नक्कीच मीही विकासापासून वंचित राहणार नाही हीच एक बोलकी भावना…
ज्यांनी माझी आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाची गरज ओळखून इथे सौर ऊर्जेचे विद्युत पोल उभारून मला प्रकाशमान केले त्यांचे मनापासून आभार , पण आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्यानावावर गावोगावी कामे मंजूर करून आणली पण म्हणावं तशी कामे न करताच बिल उचलून घेतली त्यांनी आतातरी सावधानता बाळगत यापुढे तरी माझ्या विकास कामात हलगर्जीपणा करु नये हीच एक रास्त अपेक्षा….

