प्रतिनिधी, कंधार
——————-
श्री शिवाजी विद्यामंदिर, कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास वाघमारे यांचे ‘गुराख्यापासून गुरुजी’ हे आत्मकथन पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन श्री शिवाजी काॅलेज, कंधार येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रो.डाॅ.दिलीप सावंत यांनी केले.कालवश खंडुजी वाघमारे दिग्रसकर यांच्या ३९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री शिवाजी विद्यामंदिर, कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास वाघमारे लिखित‘ गुराख्यापासून गुरुजी’ या आत्मकथन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिध्दार्थनगर, कंधार येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी काॅलेज, कंधार येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रो.डाॅ.दिलीप सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शंकरराव आंबटवाड, प्रा.ललिताताई आंबटवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कालवश खंडुजी वाघमारे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘गुराख्यापासून गुरुजी’ या आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रसिद्ध कवी तथा लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. ‘गुराख्यापासून गुरुजी’ या पुस्तकावर प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ.ज्ञानेश्वर डाखोरे यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले.
याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ.दिलीप सावंत म्हणाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास वाघमारे यांच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली. गुराखी ते गुरुजी हा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. त्यांना खऱ्या अर्थाने गुराढोरांचा आशीर्वाद लाभला. त्यांनी ‘गुराख्यापासून गुरुजी’ या पुस्तकात गरीबीची व्यथा मांडली, असेही ते म्हणाले.
या पुस्तक प्रकाशनानंतर कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नाना गायकवाड हे होते. यावेळी राहुल जोंधळे, भरतकुमार वाघमारे, भगवान आमलापुरे, धनंजय सोनकांबळे, माधव जाधव, ज्ञानेश्वर डाखोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, पांडुरंग पांचाळ, सौ.सारिका गायकवाड, देवीदास वाघमारे, दिलीप सावंत आदी कवींनी एकापेक्षा एक बहारदार कविताचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवींनी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विलास कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र ढवळे, मुख्याध्यापक मल्हारी कांबळे, मुख्याध्यापक गौतम गवळे, मुख्याध्यापक सी.डी.कांबळे, सहशिक्षक जितेंद्र गवळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर सोनकांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रोहिदास वाघमारे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दत्तात्रय वाघमारे, सौ.सविता वाघमारे, सौ.रेशमा वाघमारे, सौ.राजश्री वाघमारे, विरांगणा कांबळे, अॅड.यु.पी.वाघमारे, अॅड.दिलीप कुरुडे, अॅड.राहुल सोनकांबळे, अॅड.सुमेध सोनकांबळे, अॅड.एम.आर.कदम, अॅड.पी.बी.कदम, अॅड.डी.जी. महाजन, अॅड.सिध्दार्थ वाघमारे, अॅड.तथागत वाघमारे, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, बाबुराव गवळे, किशन गवळे, नामदेव कांबळे, दिपक कांबळे, अनिल सुर्यवंशी, अरविंद बनसोडे, दिग्विजय दिग्रसकर आदींसह मित्र, नातेवाईक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.पांडुरंग पांचाळ यांनी केले. तर आभार सुप्रसिद्ध कवी तथा लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मानले.

