( मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष )
भारत देश इंग्रजाच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला असला तरी महाराष्ट्रातील मराठवाडा मात्र जुलमी निजामी राजवटीत गुलाम होता. मराठवाड्याला निजामी संस्थांनातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी निजामी सैन्याशी सामाना करत स्वातंत्र्य सेनानीनी रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले. लोहा शहरातील विठ्ठलवाडी भागातील नळगे यांच्या चिरेबंदी वाड्यावर निजामी सैनिकांनी हल्ला चढविला. त्यामध्ये शुर योद्धे लक्ष्मणराव नळगे यांना हौतात्म्य आले. तर नरवीर माधवराव नळगे यांनी तेथून लपत छपत दिल्ली गाठून तत्कालीन देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची भेट घेवून निजामी जुलमी राजवट उलथवून लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात असल्याने मराठवाड्यात निजामाची राजवट होती. निजामी सैनिक मराठवाड्यातील नागरिकांवर अन्याय अत्याचार करत असल्यामुळे निजामी राजवटी विरुद्ध येथील नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष व चिड होती. भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला असला तरी मराठवाडा हा निजामाच्या गुलामगिरीत होता. निजाम राजवटीतून मराठवाड्यातील नागरिकांनी निजाम संस्थांना विरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे निजामी सैन्याने नागरिकांवरील अत्याचारात वाढ केली. मराठवाडा मुक्ती संग्रामात लोहा तालुक्याची मोठी भूमिका होती. त्यात लोहा शहराचेही विशेष योगदान आहे. सदरील लढ्यात मराठवाड्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्कारले, अनेकांनी तुरुंगवास भोगला. सदर स्वातंत्र्य लढ्यात लोहा शहरातील नरवीर माधवराव नळगे हे मोठे जमीनदार, सोन्या-चांदीचे दुकानदार होते. त्यांचा विठ्ठलवाडी येथे चिरेबंदी वाडा होता. सदरील वाड्याला निजाम सैनिकांनी वेढा घालून कांहीं दिवस हल्ला चढविला. वाड्यात लहान बालकांसह महिला, वृद्ध तसेच परिसरातील अनेकजण अडकून पडले. नरवीर माधवराव नळगे यांच्या नेतृत्वात वाड्यातील बहादुर नागरिकांनी निजामी सैनिकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.
निजाम सैनिकांनी नळगे शरण येत नसल्याने गोळीबार करून वाड्याला अक्षरशः पेटवून दिले. त्यामध्ये वीर लक्ष्मणराव नळगे यांना हौतात्म्य आले. महिला, मुले असल्यामुळे घाबरलेले नळगे कुटुंबीयांनी घरातून (वाडा) पळ काढला. त्या दरम्यान गोंधळात बबिता आणि शिवाजी ही दोन बाळ पाळण्यात विसरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाड्यातून त्या बाळानां सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
नरवीर माधवराव नळगे यांनी लपत छपत सहा किमी अंतरावरील तालुक्यातील धानोरा (म) येथील देशमुख यांच्या वाड्यावर आश्रय घेतला. सदर बाब ही निजाम सैनिकांना समजल्याने त्यांनी धानोरा (म.) गावाला वेढा घातला. तिथूनही माधवराव आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी साधूच्या वेषात पळ काढत पंढरपूर गाठले. तिथून माधवराव नळगे यांनी दिल्ली येथे जावून देशाचे तत्कालीन पाहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेवून निजामी सैनिकांकडून मराठवाड्यातील नागरिकांवरील अन्याय अत्याचाराची रझाकारी संदर्भात इत्यंभूत माहिती दिली.
सर्व कहाणी ऐकून घेतल्यानंतर सरदार पटेल यांनी निजामी राजवट उलथवून लावण्यासाठी हैदराबाद संस्थानात भारतीय सैन्य रणगाड्यासह पाठविले. निजामाने भारतीय सैन्यापुढे हात टेकले आणि त्यातून दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्याला निजामी राजवटीतून कायमची मुक्तता मिळाली. तेंव्हापासून हैद्राबाद संस्थानात संपुर्ण मराठवाडा येत असल्यामुळे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन ऐवजी त्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असे म्हटल्या जाऊ लागले.

