सात महिन्यांपासून बंद २२ ऍलोपॅथी गोळ्या; योग-आयुर्वेद उपचारांचा सकारात्मक परिणाम
मुखेड : (दादाराव आगलावे)
मुखेड तालुक्यातील पाखंडेवाडी येथील भूमिपुत्र योगाचार्य तथा नांदेड योगरत्नभूषण सिताराम सोनटक्के गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त असलेले वसमत येथील माजी मुख्याध्यापक शिवाजी रामलिंग स्वामी यांनी आज पूर्णपणे आरोग्यसंपन्न जीवनाकडे वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्यावर सुरू असलेल्या २२ ऍलोपॅथी औषधांच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या असून त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या आता सामान्य पातळीवर आल्याची माहिती समोर आली आहे.
योग, प्राणायाम आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून अनेक आजारांवर मात करता येते, याचे जिवंत उदाहरण नांदेड येथे पाहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसमत येथील माजी मुख्याध्यापक तसेच सध्या नांदेड शहरातील सरपंच नगर भागात वास्तव्यास असलेले शिवाजी रामलिंग स्वामी यांना काही महिन्यांपूर्वी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला त्यांच्यावर नांदेड येथे दोन ते तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विविध रक्तचाचण्या आणि शारीरिक तपासण्या केल्यानंतर त्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळा असल्याचे निदान झाले.
तपासणीत हृदयाशी संबंधित रक्तप्रवाहामध्ये सुमारे ८३ टक्के अडथळा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असून किडनीवरही त्याचा परिणाम झाल्याचे आढळले. याशिवाय कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळीही धोकादायकरीत्या वाढल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वामी यांच्यावर तत्काळ एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करून हृदयातील अडथळा दूर करण्यात आला. सुमारे दहा ते बारा दिवस हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते नांदेड येथील आपल्या घरी परतले. दरम्यान, नांदेड येथे नित्य योग सेवा समितीच्या माध्यमातून “हर घर योग” ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मोफत योग शाखा सुरू करून नागरिकांना योगाभ्यासासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याच उपक्रमाच्या निमित्ताने शिवाजी स्वामी यांची भेट योगाचार्य सिताराम सोनटक्के गुरुजी यांच्याशी झाली.
या भेटीत स्वामी यांनी आपल्या आजाराची संपूर्ण माहिती व वैद्यकीय अहवाल गुरुजींना दाखवले. त्यानंतर सोनटक्के गुरुजी यांनी त्यांची प्रकृती लक्षात घेऊन विशिष्ट प्राणायाम पद्धती, रोगानुसार योगासने आणि जीवनशैलीतील बदल यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आयुर्वेदिक पद्धतीतील काही औषधी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी स्वामी यांनी नियमितपणे प्राणायाम, योगासने आणि आयुर्वेदिक औषधांचे सेवन सुरू केले. काही महिन्यांच्या सातत्यपूर्ण साधनेनंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. कालांतराने त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारली, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य झाली तसेच किडनीचे क्रिएटिनिन स्तरही नॉर्मल श्रेणीत आले. याशिवाय साखरेचा त्रास देखील नियंत्रणात येऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचे निदर्शनास आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपचारानंतर काही काळातच त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या २२ ऍलोपॅथी औषधांच्या गोळ्या हळूहळू बंद करण्यात आल्या. गेल्या सात महिन्यांपासून एकही ऍलोपॅथी औषध न घेता ते सध्या पूर्णपणे निरोगी व तंदुरुस्त जीवन जगत आहेत.
आपल्या प्रकृतीतील झालेल्या सकारात्मक बदलाची माहिती स्वामी यांनी स्वतः दूरध्वनीद्वारे योगाचार्य सिताराम सोनटक्के गुरुजी यांना दिली. तसेच निस्वार्थ भावनेने कोणतेही मानधन न घेता आमच्यासारख्या रुग्णांना मोफत योग-आयुर्वेद उपचार व मार्गदर्शन करणाऱ्या सोनटक्के गुरुजींचे आभार मानले. योगाचार्य सोनटक्के गुरुजी यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक रुग्णांना आरोग्य लाभत असून “हर घर योग” ही संकल्पना समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढत असून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्यास प्रेरणा मिळत आहे. योगाचार्य सिताराम गुरुजी सोनटक्के यांचा येत्या योगदिनी नांदेड शहरांमध्ये 51 योग वर्ग उघडण्याचा मानस असून सध्याला 11 ठिकाणी योग वर्ग नियमित सुरू आहेत. अत्यंत झपाटलेल्या योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

