नांदेड : प्रतिनिधी
मोडकळीस आलेला समाज आणि सामाजिक मूल्ये व्यवस्था पुन्हा नव्याने उभी करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे . असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे . ते समता विद्यालय उस्मानानगर ता. कंधार येथील प्रा. नागोराव लोंढे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
पुढे बोलताना ते म्हणाले की , आज युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत . सामाजिक सौहार्द , बंधुभाव, एकता, आणि समता संपण्याच्या मार्गावर आहेत अशा सामाजिक अधोगतीमधून समाजाला बाहेर काढण्याची शेवटची आशा म्हणजे शिक्षक असतात . आज सेवानिवृत्त होणारे प्रा नागोराव लोंढे हे अशा शिक्षकांचे प्रतिनिधी असल्याचे नांदेडे यांनी प्रतिपादन केले .
समता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली समता विद्यालयात हा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला . प्रतिमांना पुष्प प्रदान करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक देशमुख यांनी केले . सेवानिवृत शिक्षक प्रा. नागोराव लोंढे यांचा भव्य सन्मानाने सत्कार करण्यात आला .
प्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांनी शिक्षकांच्या जीवनाचा यशोपट त्यांच्या निष्कलंक कार्य कर्तृत्वात असल्याचे सोदाहरण पटवून सांगितले . प्रा. विश्वास पांडे यांनी नागोराव लोंढे यांच्या विद्या व्यासंगाचे कौतुक करून त्यांच्या संवेदनशीलतेचा गौरव केला . अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांनी लोंढे सरांच्या नम्र विनम्र वर्तनात त्यांच्या संस्कार सामर्थ्याचे गुपित असल्याचे सांगितले . सत्कार मूर्ती प्रा नागोराव लोंढे यांच्या दोन्ही कन्यांनी भावनेने ओथंबलेले विचार व्यक्त करून श्रोत्यांच्या नेत्रात अश्रू उभे केले . प्रा नागोराव लोंढे यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची भक्कम उभारणी करण्यात आपली मानवी जीवन मूल्यांवरील अढळ श्रद्धा उपयोगी पडल्याचे विशद केले … आपल्या अध्यक्षीय भाषणात श्यामसुंदरराव जहागिरदार यांनी प्रा लोंढे यांच्या कुशल अध्ययन अध्यापनामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनात चैतन्य फुलल्याचे सांगून लोंढे यांना शतायुषी होण्याचा आशीर्वाद दिला . या प्रसंगी तुकाराम वारकड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कौन्सलये , प्रा मकडूम शेख आदींनी समायोचित भाषणे केली .
या प्रसंगी मुकुंदराव कुलकर्णी, माजी सभापती आनंदराव शिंदे, प्रा. शेळगावकर, प्रा. पी एन कोलारकर, धनंजय बोरगावकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे, शंकरराव काळे, विश्वनाथ पांडागळे , गोविंदराव कौन्सलये, माजी सभापती लक्ष्मीबाई घोरबांड , पुंडलिकराव पाटील , परिसरातील पत्रकार गणेश लोखंडे, सूर्यकांत माली पाटील, माणिक भिसे, लक्ष्मणराव कांबळे आदी पत्रकार , शिक्षक, सरपंच , नागरिक आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन परशुराम कौशल्ये यांनी केले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार प्रदर्शन केले .

