कंधार, प्रतिनिधी
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद व समन्वय असणे अत्यंत आवश्यक असून मुलींना दर्जेदार शिक्षणासोबतच उत्तम संस्कार, आत्मविश्वास आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसीकर यांनी केले.
कंधार येथील प्रियदर्शनी माध्यमिक कन्या शाळेत आयोजित पालक मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी संजय शिक्षण संस्था, कंधारचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे, पर्यवेक्षक प्रविण जोगे, शिक्षक-शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वर्षाताई भोसीकर म्हणाल्या, विद्यार्थिनींच्या यशामागे शाळा आणि पालक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. पालकांनी मुलींशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन द्यावे. स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.
त्यांनी पालकांना मुलींच्या नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थिनींच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करून पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.मेळाव्यात विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच पालकांच्या सूचना, अपेक्षा आणि प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे पालक व शिक्षकांमधील सुसंवाद अधिक दृढ होऊन विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

