आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान देणगी माझा मुलगा विशाल याचा वाढदिवस आहे. आज तो सदतीस वर्षांचा होत आहे. पण माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तोच लहानसा, निरागस, हसरा बाळ उभा आहे जो माझ्या कुशीत झोपायचा, माझ्या बोटांना धरून चालायचा आणि माझ्या आयुष्याला अर्थ देऊन गेला.
विशाल,
आज बाबा म्हणून हे सगळं लिहिताना माझे डोळे पाणावले आहेत. कारण या प्रवासात मला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. खूप संघर्ष करावा लागता .एकांतात खूप अश्रूही गाळावे लागले. वरील सगळं विसरुन तुझ्या निरागस चेहऱ्यावरचं प्रेम मला जगण्याचं बळ , प्रेरणा देत होतं.
विशाल,
तू जन्माला आलास तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. त्या दिवशी मला दुसऱ्यांदा “बाबा” म्हणवून घेण्याचा मान मिळाला. तुझा तो छोटासा चेहरा, ते निरागस डोळे, ती हलकीशी रडण्याची आवाज सगळं अजूनही आठवतंय.
मला आठवतंय, तुला पहिल्यांदा कुशीत घेतलं तेव्हा मी मनात म्हटलं होतं “ माझं आयुष्य आता पूर्ण झालं.तू माझ्यासाठी एक वरदान होतास. ” पण भविष्यात माझ्यासाठी काय वाढून ठेवलं होतं ते मला कुठं माहित होतं.तू आठ महिन्यांचा असतानाचा कठीण काळाचं अस्त्र माझ्यावर कोसळलं.
विशाल,
तू अवघा आठ महिन्यांचा होतास तेव्हा माझ्या आयुष्यात एक मोठा वादळ आलं.तुझी आई त्या काळात मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त होती. ती मेंटली डिस्ट्रब झाली होती. मी कोण तू कोणत हेही ती ओळखण्यासही तयार नव्हती. माझ्या मनावर खूप ताण होता.परिस्थिती,जबाबदाऱ्या, समाज, घर, संसार या सगळ्यांचा माझ्या मनावर परिणाम होत होता.आणि एक दिवस असा आला की ती तुला आणि विजयला घेवून मला हदगावला सोडून माहेरी निघून गेली.
तो दिवस माझ्या जीवनातील काळाकुंठ दिवस होता. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.
माझ्यासोबत लक्ष्मीताई आणि रघुनाथ भाऊ होते.त्यांनी मला मदत केली.तरी तुझ्या बाबाचा हा जीवनातला खडतर संघर्ष होता. काही दिवसानंतर मी तुला आणि विजयला घेवून आलो .त्या दिवसापासून पाच सात वर्ष मी फक्त मी एकटाच तुमचे “बाबा” आणि “आई” दोन्ही झालो होतो.माझ्या हातात तू होतास आठ महिन्याचा लहानसा, निष्पाप, काहीच न कळणारा.माझ्या मनात हजार प्रश्न होते आता तुला कोण सांभाळणार?तुला आईचं प्रेम कसं मिळणार?मी तुम्हाला पुरेसा वेळ देऊ शकेन का?मी तुम्हाला योग्य संस्कार देऊ शकेन का?हे प्रश्न मला सतत छळत राहीले.पण त्या सगळ्या प्रश्नांपेक्षा एकच गोष्ट महत्त्वाची होती माझी मुलं कधीच एकटी पडणार नाहीत.विशाल,
मी सतत तुम्हाला आईसारखं प्रेम देण्याचा प्रयत्न करत राहीलो.त्यात मी कदाचीत कमी पडलोही असेल. हदगावला लक्ष्मीताईनी तुम्हाला सांभाळलं ;पण विष्णुपुरीला मी एकटाच होतो.मी तुला आंघोळ घालायचो,मी तुम्हाला जेवू घालायचो,मी तुम्हाला झोपवायचो,मी तुम्ही आजारी पडलात तर रात्रभर जागत बसायचो…कधी कधी वाटायचं “मी बाबा आहे की आई?”पण मला फरक पडत नव्हता.कारण तूम्ही माझा श्वास होतात, माझं जग होतात.
रात्री कधी तू ही तापाने फणफणत असताना मी निसर्गासमोर गुपचूप रडून म्हणायचो “माझं काहीही घे, पण माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस.”
विशाल,
पगार कमी होती. तसं तर मी गरिबी, संघर्ष आणि मेहनत आगदी डांबर रोड, रोजगार हमी योजनेवर काम करून करुनच इथंपर्यंत पोहचलोय.
माझं आयुष्य खूप सोपं नव्हतं.कधी पैशांची अडचण,कधी कामाचा ताण,कधी समाजाची टोचणी,कधी लोकांचे प्रश्न “बायको कुठे आहे?” “एकटाच कसं राहतोस ? जेवन कसं तयार करतोस?” “मुलाला आईशिवाय वाढवतोस?” मला चांगलं आठवतंय कित्येक वेळी तुम्हाला हॉटेलमधील खिचडी खाऊ घालून मी रात्रीला उपाशी झोपत होतो.
काही स्त्री पुरुष खालच्या पातळीची भाषा वापरायचे. त्यांचे हे प्रश्न मला टोचायचे.त्यामुळे आत्महत्या करून घ्यावी.जगून उपयोग नाही.असे विचार मनात घोंगावत.नेमकं त्याच वेळी तूझा आणि विजयचा चेहरा माझ्यासमोर थांबायचं.तूझं निरागस हसणं दिसायचं. लहणपणी तुझ्या गालावर पडणारी खळी आठवायची,क्षणात आत्महत्याचा विचार मनातून पळायचं.नंतर मी ठरवलं की जीवनात कधीही हार मानायची नाही व हार मानली ही नाही.कारण मला माहित होतं मी हरलो, तर तूम्ही ही हरणार. मला तुम्हाला जीवनात हरू द्यायचे नव्हते.
तुझं बालपणात मी अनेक स्वप्न रंगवत होतो. कदाचीत त्यावेळी ते माझं स्वप्न हौस राज्याची व नांदणुक कैकाडयाची असेल.त्यावेळी तू लहान असताना शाळेत जायचास,तुझी बॅग, तुझं डबा, तुझं पुस्तक…हे सगळं पाहून मला खूप आनंद व्हायचा.तू पहिल्यांदा “बाबा” म्हणाला तेव्हा माझं काळीज भरून आलं होतं.तू पहिल्यांदा चालायला लागलास,पहिल्यांदा शाळेत गेला, पहिल्यांदा बक्षीस मिळवलंस…प्रत्येक क्षण माझ्यासाठी सणासारखा होता.
तूला आईची उणीव भासू नये म्हनून मी माझी जबाबदारी उचलण्याची कसोशीने प्रयत्न केलोय .
विशाल,
मला माहित आहे तुमच्या आयुष्यात आईची उणीव कायम राहिली असेल ? पण फार कमी काळ तुलाला असं वाटलं असेल “ आमची आई कुठे आहे?” “ आमच्यासोबत का नाही?” पण असे प्रश्न तुम्ही मला कधी विचारला नाहीत. कदाचीत त्या प्रश्नांची उत्तरं देताना माझं मन तुटलं असतं, नाही का ?
बाळा,
पण मी तुम्हाला कधीच आईच्या विरोधात सांगितलं नाही.होय एवढं निश्चित सांगितलं “तुझी आई आजारी आहे. तिच्यावर राग धरायचा नाही. तिच्या विषयी काही वाईट बोलायचं नाही.”
मी तुम्हाला कधी तिच्याविरुद्ध बोलू दिलं नाही. तिला भेटण्यास जावू नका म्हणून सांगितलं नाही. मला व्देष शिकवायचा नव्हता.कारण तू आणि विजू माणूस म्हणून मोठं व्हावेस, कोणाचं द्वेष नको. हा माझा विचार होता व आहे.
विशाल,
आज तू माझा अभिमान आहेस.आज तू ३७ वर्षांचा झालास.आज तू जबाबदार आहेस,समजूतदार आहेस,संस्कारी आहेस,कष्टाळू आहेस.हे पाहून मला वाटतं माझं आयुष्य सफल झालं.आज लोक तुला आदराने पाहतात.तुझ्या वागण्यात नम्रता आहे.तुझ्या बोलण्यात संस्कार आहेत.याचं श्रेय तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या संयमाला आहे.
विशाल,
कदाचित मी तुला कधी सांगितलं नसेल ; पण तूम्ही माझे चारही मुलं माझं सगळं जीवन आहात .तुमच्याशिवाय माझं आयुष्य रिकामं आहे.मी कधी आजारी पडलो,कधी थकलो,कधी निराश झालो.तेव्हा तुमचा चेहरा पाहून मला ताकद मिळालेली आहे.तूम्ही आमचं आधार आहेत. तुम्ही आमचे अभिमान आहात.
तूम्ही आमचं जग आहात.माझ्या बाळास माझ्या लाडक्या विशाल तूला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
परमेश्वर तुला ,निरोगी आयुष्य देवो ,यश देवो ,समाधान देवो,प्रेम देवो,सन्मान देवो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख मिळो.
शेवटी थोडक्यात सांगतोय ,आज मी मागे वळून पाहतो,तर वाटतं आपण सगळयांनी खूप मोठा प्रवास केला आहे.वेदनेतून हसू शोधलं,अश्रूंमधून आनंद निर्माण केला,अंधारातून प्रकाश मिळवला.
विशाल,
माझ्या जीवनात आलेला अपमान, मी सहन केलेल्या वेदना तूम्ही मुलं नसता,तर कदाचित मी आज जिवंतही राहीलो नसतो.तूम्ही मला जगायला शिकवलात. वाईट,संकटमय परिस्थितीसमोर मी कधी झुकलो नाही, वाकलो नाही. कधी लाचारी पत्करलो नाही ,पत्करणार नाही .
तुमचा अभिमानी बाबा,
राठोड मोतीराम रूपसिंग.

