प्रतिनिधी (कंधार) :
कंधार तालुक्यातील प्रलंबित पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी ठाम मागणी स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) कंधार तालुक्याच्या वतीने तहसीलदार कंधार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत मदत मिळणे अपेक्षित असताना अनेक पात्र शेतकरी आजही विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
कंधार तालुक्यातील काही कृषी मंडळांमध्ये विमा रक्कम वितरित करण्यात आली असली तरी कंधार, कुरूळा, दिग्रस, फुलवळ आणि उस्माननगर या मंडळांतील हजारो शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित असल्याचा आरोप संघाने केला आहे. पंचनामे पूर्ण होऊनही केवळ प्रशासकीय कारणांमुळे विमा वितरण रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते आणि इतर शेतीकामांसाठी निधीची गरज असताना विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित पीक विमा रक्कम जमा करावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रणितकुमार बालाजीराव आनकाडे यांच्यासह तालुका उपाध्यक्ष संदीप तोंडचिरे, शहर अध्यक्ष प्रेमानंद गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष सुरज आनकाडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख हेमंतकुमार कंधारकर, तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष इंद्रजित गिरी, पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्ष बालाजी बसवंते, तालुका संपर्क प्रमुख एकनाथ मिरकुटे, तालुका संयोजक विद्यासागर वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

