भाषा मरता देशही मरतो.संस्कृतीचा दिवा ही विझे.. असे साहित्यिक वि. वा.शिरवाडकर यांनी म्हटले आहे.
मराठी भाषा अभिजात झाली.तो दर्जा टिकवून ठेवणे,आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.आपली माय मराठी मरत असताना इतर भाषेचे पाय दाबत बसू नका.दुस-यांचे गुलाम होऊन आपल्या भाषेचे शीर कापुन टाकू नका. मराठी ही केवळ शब्दांची माळ नाही. तर ती आपल्या रक्तात वाहणारी जीवनधारा आहे. मी मराठी बोलणार ..मी मराठी लिहिणार .. मी मराठी वाचणार..मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच प्राप्त झाला.दरवर्षी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.कारण वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.मराठी भाषेचे खरे मारेकरी कोण?. खरोखर आपणच आपल्या मराठी भाषेचे खरे मारेकरी आहोत काय? सकाळी गुड मार्निग पासून संध्याकाळी गुड नाईट पर्यंत आपला कारभार इंग्रजी मधून चालत आहे.
आपण दोष कोणाला द्यावे. मराठी भाषेत असणारे शब्द वरच्यावर कमी कमी होत आहेत.अस्सल गावरान शब्दांचा खजिना असलेली मराठी भाषा आता इंग्रजी शब्द जोडून दुःखी झाली आहे. त्यामुळे आपण सगळे त्यास कारणीभूत आहोत काय. गुरु,गुरुजी, मास्तर शब्द सोडून देऊन आपण सर कडे चालत आहोत. किती वेळ झाला, म्हणजे आपण टाईम किती झाला असे इंग्रजीतून बोलून आपण इंग्रजीचा मोठेपणा दाखवत आहोत. आपण दुसऱ्याचे लेकरू स्वतःच्या कडेवर घेऊन आपलं लेकरु चालत रस्त्यांना नेत आहोत.अशी अवस्था सध्या मराठी भाषेची झाली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे जर सर्वे केला तर त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकत आहेत. तर इंग्लिश मीडियमच्या शाळा आपोआपच सांगितल्या जातात. इथे कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही.खरंच आपण मराठीवर प्रेम करतो का?नुसत्या गप्पा मारतो. आपल्या हातात मोबाईल आहे.
आपण भ्रमणध्वनी कधीच म्हणत नाही.मराठी भाषा बोलायला आपल्याला संकुचित पणा येतो. आपण गावंढळ भाषा बोलायला लागलो.असा त्याचा अर्थ होतो. उत्तीर्ण झालो असं नाही म्हणता; पास झालो.असा टेभा मिरवतो. आपण हे सुद्धा लक्षात घ्यावे. वृत्तपत्राला आपण पेपर इंग्रजीतून बोलून टाकतो.अनावश्यक ठिकाणी आपण इंग्रजी बोलून मराठीचा प्रॉब्लेम करत आहोत.त्यामुळे छोट्या मुलांना मराठीतील शब्द विसरून गेले आहेत.फावला वेळ,फिदी फिदी हसणं.फतकल मारून बसणे.भोकाड पसरणे.रंगात येणे.उंटाच्या …मुका घेणे. खाली मुंडी पाताळ धुंडी. असे कितीतरी शब्द आपण विसरून जाऊन मराठी भाषेला कमकुवत केले आहे. आपण आपले मराठी भाषा प्रमाण भाषेत बोलून किंवा बोली भाषेत बोलून तिचा गोडवा वाढवावा. प्रत्येकापासून ती वाढावी पण प्रत्यक्ष इंग्रजीतून बोलून आपण मराठी वाक्यरचना केली .
तर मराठीची भाषेची घालमेल होईल.आईची भाषा तीच आपली बोली भाषा असते. आपली ही भाषा व्यवहारासाठी वापरता येते.सध्या इंग्रजी भाषेचे पेव सर्वत्र फुटले आहे. त्यामुळे जो तो इंग्रजी भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत
.त्यामुळेच आपल्या मराठी भाषेचे व्याकरण आता सर मिसळ झाले आहेत. शुद्धता राहिली नाही.नाम, सर्वनाम,क्रियापद,क्रियाविशेषण, वाक्यरचना शुद्ध करायचे असते. परंतु ही गोष्ट आता इतिहास जमा होत आहे.मराठी भाषेत इंग्रजी शब्दाचा शिरकाव होऊन तोच परवलीचा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे व्यवहारात,चित्रपटात, समाजात शाळेत,बाजारात सर्वत्र सरमिसळ इंग्रजी शब्दांत मराठी बोलून मराठीची वाट लावली जात आहे. हे कटू सत्य आहे. सुप्रभात म्हटल्यानंतर अनेक जण तोंड वेडेवाकडे करतात. इथपासूनच मराठी भाषेची अलर्जी यांना झाली आहे. असे कळून चुकते. कित्येक जण मराठी भाषेत फक्त मराठी भाषा बोला म्हणून आग्रह करतात.आणि स्वतः इंग्रजीतून शब्द बोलतात.यांची नवल वाटते.अनेक साहित्य संमेलना मधून साहित्यिक सुद्धा मराठी शब्दांचा वापर इंग्रजी मध्ये करतात. मराठी भाषेचे शिवाजी,मराठी भाषेला अभिजात दर्जा,मराठी भाषा साता समुद्रापलीकडे गेलेली भाषा, मराठी भाषा गौरव या सर्व गोष्टीचा विचार करून मराठी भाषा वाचवता येते.अनेक साहित्यिकांना,कवयित्री, कवी,लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन मराठी भाषेचा गौरव करता येतो.मराठी विषय हा सक्तीचा केला पाहिजे.अनिवार्य म्हणून ठेवला पाहिजे.ऐच्छिक म्हणून कधीच ठेवू नये.गावोगावी मराठी साहित्य परिषदेच्या शाखा काढून मराठी विषयाची गोडी प्रत्येक व्यक्तीला लावावी लागते.यामध्ये महिला अतिशय महत्त्वाच्या आहेत.सध्या महिलांनाच त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकावे वाटते.शेजारचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो.त्यामुळे आपला का जात नाही. ही एक न दिसणारी अदृश्य शक्ती महिलांमध्ये आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तकांच्या वाढलेल्या किमती हे सुद्धा एक कारण आहे.त्यासाठी प्रकाशकांना अनुदान देऊन त्यामधून पुस्तकाच्या किमती कमी करता येतील; असे मला वाटते. दवाखान्याच्या बाटली वरील औषधाची माहिती सर्व इंग्रजीतून असते त्यामुळे ती सुद्धा वाचता येत नाही.कोर्टामधून इंग्रजीमध्ये संपूर्ण माहिती वादी- प्रतिवादी यांना दिली जाते.त्यामुळे इंग्रजी भाषा न समजल्यामुळे सुद्धा एक दोन तारखा पुढे जाण्याची दाट शक्यता असते.मराठी भाषिक असून सुद्धा विवाहच्या पत्रिका इंग्रजीमधून काही अति उत्साही लोक छापत आहेत. हे सुद्धा विचार करण्यासाठी गोष्ट आहे. इंग्लिश मिडीयमच्या शाळा मधून सणवार,उत्सव, वेगवेगळ्या तिथी,या कमी प्रमाणात सांगितल्या जातात. त्यामुळे नैतिक मूल्ये सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.हे विशेष लक्षात आणून देणे या निमित्ताने मला गरजेचे वाटते.
माणूस संगणक ,माउस, प्रिंटर, झेरॉक्स, ड्रायव्हर, कंडक्टर ,वॉटर, बॅग, मास्क ,डॅडी ,मम्मी, स्कूल, टाईम-टेबल, फी, हॉस्पिटल, एक्झाम, टेस्ट मॉडरेटर, एक्झामिनर बोर्ड ,अन्सर पत्रिका. मोबाईल ,स्क्रीन, झिरो ,हीरोइन, हीरो,बॉय ,गर्ल,काऊ ,डॉग,बीपी, शुगर, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी,सिझर,एरोप्लेन,रेल्वे स्टेशन ,पॅड, अशा अनेक इंग्रजी शब्दांमुळे मराठीच्या शब्दाची संख्या कमी झाली आहे. इंजिनिअर म्हटलं की पटकन समजते. आणि अभियंता म्हटलं की लोक हसतात. मराठीत बँकेला अदिकोष म्हणतात.
हे बोलल्यानंतर लोकांना हसू येते. वरील सर्व उदाहरणावरून मराठी भाषेला आपणच हळूहळू संपत आहोत. असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मराठीच्या बोलू कौतुकें असे १२ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेले आहे. याची जाणीव आपल्याला ठेवणे गरजेचे आहे. म्हांइभट्टानी लीळा चरित्रामध्ये सुद्धा मराठी भाषा किती सर्वश्रेष्ठ आहे. हे सांगितलेले आहे. कवी मुकुंदराजानी विवेकसिंधु हा ग्रंथ लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची माहिती आणि राज्यकारभार संपूर्ण मराठी भाषेतूनच चालवला.राज्य व्यवहार कोश त्यासाठी तयार केले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ मराठीतून लिहीलेला आहे. याची जाणीव मराठी भाषिकांना असावी. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता मराठी भाषेतून लिहिलेली आहे.संत तुकाराम महाराजांनी आपले ग्रंथ सर्व मराठी भाषेतूनच लिहिले.संत एकनाथ महाराजांनी भागवत,भारूडे लिहिले. साधू संतांनी,शाहीरांनी मराठी भाषेला चांगले दिवस आले होते. त्यामुळेच मराठी भाषा अभिजात झाली.परंतु अलीकडच्या काळामध्ये भाषिक वाद, प्रांतवाद निर्माण झाला आहे.लोकांच्या हातात अनेक झेंडे आले. त्यामुळे लोकांच्या मुखातली भाषा बदलली. एकमेकांच्या विरोधात भाषिक आंदोलने होऊ लागले. त्यामुळे आज मराठी आपली आजारी पडत आहे. ती लोप पावू नये.यांची चिंता आपल्याला असावी.
सर्वच शैक्षणिक,आरोग्य विद्यापीठांनी आपला अभ्यासक्रमात मराठी भाषेचा जास्तीत जास्त अभ्यासक्रम वाढवावा.आंतरराष्ट्रीय अंकाबरोबर मराठी अंकाचा सुद्धा प्रत्येक प्रकाशन संस्थांनी विचार करावा.आणि कॅलेंडरवरील मराठी अंक छापावेत. रस्त्यावरील दिशादर्शक बोर्ड सर्व मराठीतच असावे.व्यवसाय करणाऱ्या दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात.फक्त २७ फेब्रुवारीलाच मराठी दिन साजरा करून इतर दिवशी मराठी भाषेची उपेक्षा होईल असे काही करू नये. सन्मानाने तिचा आदर करावा. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष : विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

