कंधार (डी.बी.पाटील)
प्रबोधनाच्या चळवळीत काम करतांना व समाजाला प्रगत दिशेने नेतांना प्रबोधनकारांना कटू शब्दात स्पष्ट बोलावेच लागते. त्यामुळे प्रबोधन करणाऱ्यांना गोड भाषा बोलता येत नाही पण समाजाला आजही प्रबोधनाची गरज असून प्रबोधनकारांच्या कडवटपणातूनच समाजाला दिशा मिळते असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक गंगाधर बनबरे यांनी केले. ते नागलगावचे भूमिपुत्र तथा फुलवळ संकुलाचे केंद्रप्रमुख नामदेवराव कुट्टे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. बी. के. पांचाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. रोहिदास चव्हाण, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, नगराध्यक्ष शाहूराज नळगे, माजी सभापती प्रवीण पा. चिखलीकर, नगरसेवक सुधाकर कांबळे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर, ॲड. विजय धोडगे, एकनाथदादा पवार, ॲड. प्रफुल शेंडगे, कंत्राटदार वैजनाथ सादलापुरे, श्यामबापु देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच नुकतेच आकस्मिक निधन झालेले हभप मधुकर महाराज बारुळकर यांना उपस्थितीतांनी आदरांजली वाहिली.
यावेळी पुढे बोलतांना बनबरे म्हणाले की, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर लोक प्रबोधनाचे काम केले. परंतु आज चाळीस चाळीस वर्षे सामाजिक चळवळीत राहून लोकहिताची काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद जर समाज घेत नसेल तर परिवर्तन हे कधीच होणार नाही. समाजाची आजची परिस्थिती जी बदलाची झाली आहे. पुढे गेली आहे. ती केवळ म. फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीमुळे म्हणुन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे कर्तबगार विद्यार्थी ही घडले. म्हणून शिक्षकांनी जर प्रबोधन करणे सोडले तर समाजाचे फार मोठे नुकसान होईल. नामदेवराव कुट्टे गुरूजी यांनी यापुढेही प्रबोधनाच्या या चळवळीत स्वतःला गुंतवुन घ्यावे. आज समाजातला माणुस हा आभाळा एवढा मोठा झाला असला तरी त्याची सावली जर समाजाला मिळत नसेल तर त्याचा काय फायदा..? पण तिळा एवढा माणुस जर समाजाच्या कामी येत असेल तर आभाळापेक्षा मोठा आहे. म्हणून सुशिक्षित माणसाने हे स्वतःला समाज सेवेच्या कामात स्वतःला जोडून घ्यावे. कारण समाज कार्य करतांना ज्ञानाची निर्मिती होते. ज्ञानाशिवाय आता कुणीच समाजाला वाचवु शकत नाही. तुम्ही पैसा खुप कमवाल पण कमवलेला पैसा टिकवायची सोय नसेल तर अज्ञानातुन दुःख निर्माण होते. म्हणुन समाजाचे अज्ञान दूर करायचे असेल तर शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असेही यावेळी बनबरे यांनी सांगितले.
याच मंचावरून नामदेवराव कुट्टे यांच्या जीवन प्रवासावरील गंगाधर बनबरे लिखित ” प्रबोधक ” नामक नामदेव कुट्टे गौरव ग्रंथ या पुस्तकाचे विमोचन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवश्री सौ. सविता कुट्टे आणि शिवश्री नामदेवराव कुट्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून नामदेवराव कुट्टे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा मांडत त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचाही गौरव केला.
यावेळी गणपतराव नाईक, तानाजी नाईक, पि.आर. ढवळे, भगवान पवार, मारोती मराशिवणे, नागोराव परिट, हेमंत थोटे, रघुनाथ नाईक, विलास कांबळे, एन.एम. कांबळे, युनुस शेख, गौतम ढवळे, ज्ञाणोबा गोमारे, भगवान चिवडे, बालाजी थोटे यासह सर्व कमिटीचे कार्यकर्ते, सहशिक्षक , केंद्रप्रमुख, गावकरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन कोकाटे, सतिश देवकत्ते यांनी केले व अध्यक्षीय समारोप ॲड. पांचाळ मनोगताने झाला त्यानंतर उपस्थितांचे सत्कारमूर्ती नामदेवराव कुट्टे यांनी आभार मानले.

