तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवुन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा, लहानापासून मोठ्यापर्यंत मैत्री जपणारा, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून अत्यंत चांगल्या पद्धतीने बातमी करून संस्कृती जपणारा, अन्याय, अत्याचाराविरोधात ज्यांच्या लेखणीमध्ये लढण्याचे सामर्थ्य आहे असे पत्रकार म्हणजे माधव गोटमवाड यांची ओळख आहे.
माधव रामु गोटमवाड यांनी वयाच्या २५ व्या वर्षांपासून म्हणजे १ जानेवारी २०२१ पासून युवाराज्य न्यूज पासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी २८ जुलै २०२१ पासून दैनिक चालु वार्ता चे मुख्य संपादक डी एस लोखंडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक चालू वार्ता कंधारचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सोबतच दैनिक चालू वार्ता मुख्य प्रबंधक महाराष्ट्र राज्य म्हणून पण ते काम पहातात. मन्याड नदीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व कड्याच्या पायथ्याला असलेल्या संगमवाडी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म ६ मार्च १९९६ साली झाला. आई लक्ष्मीबाई व वडील रामू गोटमवाड हे दोघेही शिक्षणापासून कोसोदूर होते. त्यांना शिक्षणाचा थोडा ही गंध नव्हता. परंतु मुलगा शिकला पाहिजे, शिकून मोठा झाला पाहिजे ही जिद्द मात्र त्यांच्या मनामध्ये होती. माधव गोटमवाड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमवाडी ता.कंधार येथे झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मनोविकास विद्यालय, कंधार या ठिकाणी झाले. यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण ही श्री शिवाजी कॉलेज, कंधार येथे झाले.
लहानपणापासूनच वाचनाची व लेखनाची आवड असणारा माधव हा अभ्यासात हुशार व होतकरू होता. हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करून पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कमी वयातच नावलौकिक केले आहे. पत्रकारिते बरोबरच त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग पहावयास मिळतो. तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन या ठिकाणी गाव खेड्यातुन येणाऱ्या लोकांना ते नेहमी मदत करत असतात. त्यांनी लिहिलेल्या बातम्यांचे लेखन हे अत्यंत प्रभावी व दर्जेदार, तसेच गोरगरीब, विमुक्त भटके, वंचित यांच्यावर व सर्वच क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे असते. निखळ मैत्री व मैत्रीमध्ये बंधुभाव जपणारा, तसेच मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे पत्रकार म्हणजे माधव गोटमवाड असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. पत्रकारितेचा कोणताही वारसा नसताना एक आदर्श पत्रकार म्हणून त्यांचे नावलौकिक आहे.
एखाद्या खाणीतल्या हिऱ्याला जशी अनेक पैलू पाडले जातात, तसेच माधव गोटमवाड यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू लाभले गेले आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने अनेकदा सन्मानित करण्यात आले असून, त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे व ते आजतागायत करत आहेत.
परिस्थिती कशीही असो त्यावर कसा विजय मिळवायचा व त्यावर कसे मात करायचे हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे. त्यांना शैक्षणिक, राजकीय व पत्रकारितेचा कोणताही वारसा नसताना ते परिस्थितीनुसार घडत गेले. एकमेकांशी जुळत गेले. कोणत्याही क्षेत्रातला एखादा व्यक्ती त्याच्या संपर्कात आला की तो त्यांनी कायमच करून घेतला व त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीची नाळ माधव यांनी कधी तोडलेली नाही. त्यांच्या लेखनातील शब्दांची प्रखरता प्रामुख्याने समाजाभिमुख असते. सर्वसामान्यांना न्याय देणारी असते. उपेक्षित, वंचित, पीडित, अन्याय, अत्याचार, सामाजिक प्रबोधन, गावगाड्यातील लोकांचे प्रश्न यावर प्रामुख्याने प्रकाश टाकणारी असते. शहरकेंद्री पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातील वास्तव मांडणे ही त्यांच्या पत्रकारितेची महत्त्वाची ओळख आहे. ग्रामीण भागात होणारे सण, सोहळे, उत्सव यात्रा, धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह यांचे वृत्तांकन करून प्रभावीपणे दैनिकात मांडण्याचे काम सातत्याने माधव गोटमवाड यांनी केली आहे. व ते आजतागायत करत आहेत. माधव गोटमवाड हे प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाचेही काम करतात. राजकीय नेत्यांच्या, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती परखडपणे घेऊन राजकीय क्षेत्रातील सत्तेचा गैरवापर लोकशाहीची पायमल्ली यावर ते परखडपणे व प्रखर शब्दात आपले मत कुणाच्याही दबावाला बळी न पडता इलेक्ट्रॉनिक मीडियावर सत्य व स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. सत्ताधाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व समस्यांची सोडवणूक त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सातत्याने केल्याचे दिसून येते. अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पत्रकारितेमध्ये आपले नावलौकिक केले असून, त्यांच्या या सर्वंकष पत्रकारितेला माझा सलाम.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारितेचा व कोणताही कसलाच वारसा नसताना घरची अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही व कोणाचेही पाठबळ नसताना केवळ शिक्षणाच्या मेहनतीच्या जोरावर कष्टाने उभारी घेत कायम पुढे जाण्याचे व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्याचे ध्येय मनाशी बाळगून नावारूपाला आलेला पत्रकार माधव गोटमवाड खाणीतून हिरा निघून चमकावा तसा माझ्या छोट्याशा संगमवाडीच्या गावकुसातून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारीतेच्या माध्यमातून सातत्याने चमकतोय याचा मला मनोमन व मनस्वी आनंद आहे.
कडा पायथ्याशी माझे गाव
स्पर्श मन्याड नदीचा झाला
ऋषी मुनींच्या सानिध्यात
एक हिरा जन्माला आला…
आज माझे मित्र माधव रामू गोटमवाड यांचा वाढदिवस आहे माधव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या लेखणीला बळी यावे, तसेच पत्रकारितेत उत्तरोत्तर प्रगती व्हावी व पुढील आयुष्य आपले सुखाचे समाधानचे व भरभराटीचे जावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व मनःपूर्वक शुभेच्छा देतो.– भास्कर अर्जूनराव गीते, कंधार
मो.९८६०८६३६८४

