-
मुखेड:(दादाराव आगलावे)
-
ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी सदाशिवराव पाटील जाधव यांना “कृषी भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर सर्व घटक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती 2026 निमित्त नांदेड येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
या कार्यक्रमात सदाशिवराव पाटील यांना “कृषी भूषण” पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर कविता मुळे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदाशिवराव पाटील जाधव यांनी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीकपद्धतीत बदल करत उत्पादनात वाढ साध्य केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करताना सदाशिवराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले व भविष्यातही अशाच प्रकारे शेती क्षेत्रात नवकल्पना राबवून इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
सदाशिवराव पाटील यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सदाशिव पाटील जाधव म्हणाले की, “शिवजन्मोत्सवाच्या पावन प्रसंगी मला कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून माझ्या कुटुंबाचा, शेतकरी बांधवांचा आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मराठी बांधवांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांप्रमाणे शेतीत कष्ट, प्रामाणिकपणा आणि नवकल्पना यांना धरून काम करत राहण्याची प्रेरणा मला मिळाली. पुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या प्रगतीसाठी निष्ठेने कार्य करत राहीन. या पुरस्काराबद्दल आमदार डॉ. तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, डॉ. एम.जे. इंगोले, प्राचार्य बी. वाय. मोरे, पत्रकार दादाराव आगलावे, पत्रकार यशवंत बोडके, शिवाजी इंगोले, किशनराव इंगोले यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

