नांदेड (प्रतिनिधी): नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पूरस्थिती व धरणे आंदोलनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष मा. राजेश पावडे, आणि महानगराध्यक्ष मा. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पूरग्रस्त जनतेच्या समस्या, शासकीय मदतीचा अभाव तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मदत व आंदोलनाच्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.
खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की,
> “पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. जनतेच्या वेदना मांडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
बैठकीच्या शेवटी सर्व विभागप्रमुख, सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रियपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

