नांदेड –( दिगांबर वाघमारे )
सोमवारी सकाळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही सेवाभावाची मशाल विझू दिली नाही. “कायापालट” या सामाजिक उपक्रमाचा ६४ वा महिना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. पावसाचा जोर कितीही असला तरी निर्धाराने कार्यक्रम राबविण्यात आला.
भर पावसात छत्री धरून रस्त्यावरच्या ४३ भ्रमिष्ट, निराधार व्यक्तींची मोफत दाढी–कटिंग, नवीन कपड्यांचे वितरण, चहा–फराळ, तसेच शंभर रुपयांची बक्षिसी देण्यात आली. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश — आर्थिक अडचणीत किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या निराधार व्यक्तींना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणे हा आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन, आणि अमरनाथ यात्रेकरू संघ यांचा सहभाग होता. मार्गदर्शन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, आणि लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांनी केले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
सुरेश शर्मा आणि शिवा लोट यांनी भर पावसात शहर फिरून योग्य व्यक्तींची निवड केली.
राजू अण्णा पुसनूर आणि प्रसाद या स्वयंसेवकांनी काळजीपूर्वक सर्वांची दाढी–कटिंग केली.
गोदावरी नदीकाठावर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी स्नानासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली.
सुभाष बंग (प्रकाश कॅप डेपो) यांच्या तर्फे बनियनची सोय करण्यात आली.
डॉ. दी.बा. जोशी व डॉ. अर्जुन मापारे यांनी सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले.
महापालिकेचे सदाशिव कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवर्धन घाट परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमामुळे अनेक निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. स्वच्छता, नवीन कपडे आणि माणुसकीचा स्पर्श मिळाल्याने त्यांचा खरा “कायापालट” झाला.
यापुढील उपक्रम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणार असून, शहरातील नागरिकांनी असहाय्य, वेडे, भिकारी, अपंग किंवा कचरा वेचणारे व्यक्ती आढळल्यास भाजप अथवा लायन्स सदस्यांना माहिती देण्याचे आवाहन संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे
सेवेचा हा अविरत प्रवास मुसळधार पावसातही थांबला नाही, म्हणूनच समाजसेवेच्या या अखंड ध्यासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (छाया: संजयकुमार गायकवाड)

