कंधार । धोंडीबा मुंडे
निसर्गाची अवकृपा आणि सततची नापिकी, या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. फुलवळ (ता. कंधार) येथील एका ४९ वर्षीय शेतकऱ्यांने डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून शनिवारी पहाटे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दत्ता बापुराव मंगनाळे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्ता मंगनाळे यांच्याकडे असलेली शेती पूर्णपणे कोरडवाहू होती.गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातील पिके पूर्णपणे वाया गेली होती. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून ग्रासलेले होते.
याच नैराश्यातून शनिवार,दि.३१ जानेवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास त्यांनी गांवातीलच शिवहार अर्जुन मंगनाळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच फुलवळ बिटचे जमादार बालाजी गारोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दुपारी फुलवळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पोलीस कर्मचारी बालाजी गारोळे पुढील तपास करत आहेत. मंगनाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,वडील, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने फुलवळ परिसरात शोककळा पसरली असून, शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

