गुंटूर येथील ग्रामस्थांच्या वतीने डॉ. पुंडे यांचा नागरी सत्कार संपन्न!
मुखेड: (दादाराव आगलावे)
माझी आई भाजीपाला विकायची, भाजीपाला विकून मला पुस्तक घेऊन द्यायची. माझ्या शिक्षणाचं खरं गमक माझ्या आईच्या भाजीपाल्याच्या टोपलीत दडलेलं होतं म्हणूनच मी राष्ट्रपती भावनापर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य तथा सर्पदोष चिकित्सक मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले.
श्री संत गजानन महाराज मंदिर गुंटूर ता. कंधार येथे अखंड हरिनाम सप्ताह, 40 वा वर्धापन दिन सोहळा व यात्रा महोत्सव दि. 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या महामहीम राष्ट्रपती, गृहमंत्रालय व महासंचालक आरोग्य सेवा भारत यांनी माझ्या सर्पदंश कार्याची दखल घेऊन ‘रिसेप्शन ॲट होम’ या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करून राष्ट्रपतीभवन नवी दिल्ली येथे गोरगरीब शेतकरी आणि शेतमजूर सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि केंद्र शासनापर्यंत पोहचली या निमित्ताने गुंटूर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. यात ते सत्काराला उत्तर देत होते. दरम्यान हभप गंगाधर महाराज हंबर्डे दरेगावकर, हभप रामकृष्ण महाराज पिंपळवाडीकर, हभप दत्ता महाराज वळसवंगडीकर, हभप प्रमोद महाराज चोंडीकर, भागवताचार्य रोहिदास महाराज कळकेकर, हभप आशाताई राऊत लातूरकर, हभप नाथ महाराज परभणीकर आणि शेवटी काल्याचे किर्तन हभप राजेश पाटील गुंजर्गेकर कर्नाटक आदींनी ग्रामस्थांना कीर्तनाची सेवा दिली. सत्काराच्या वेळी कर्नाटकचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप राजेश पाटील गुंजर्गेकर
यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे पुढे म्हणाले की, भागवत कीर्तन सप्ते पारायण एवढी गर्दी पाहून समाजाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहिती आहेच. कुत्र्याच्या लाळेत वीष असतं, विंचवाच्या नांगित, सापाच्या दातात पण माणूस असा एक प्राणी आहे की त्याच्या हृदयात वीष असतं. सापाचं वीस उतरायला आमच्याकडे औषध आहे माणसाचं वीस उतरायला महाराजा सारखं कार्य करावं लागतं. आदमी मे जहर इतना भर गया है,
विष धरोंका वंश सारा डर गया है,
एक दिन तुम जरूर सुनोगे,
आदमी के काटने से साप कोई मर गया है… व्यक्ती एवढा विषारी झाला आहे ही परिस्थिती आता सगळीकडे झाली आहे. परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे की, हिंसाचार दंभाचार, भ्रष्टाचार, स्वेराचार या चार आचारामध्ये समाज बुडून जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दवाखान्यामध्ये परिस्थिती खूप भयानक असते. माय बापांना दाखवायला कोणी तयार नसते. आज-काल म्हातारी माणसं म्हणजे टाकाऊ माणसे झाली आहेत. मी दवाखान्यात रोजच पाहतो. शेतकऱ्याचे आई-वडील चांगले आहेत, शिकलेलेच बदमाश असतात आणि त्यांचेआई-वडील वर्धाश्रमात राहतात. लोक देवं करत सारं जग पालथ घालतात
मायबाप केवळ काशी,
तेणे नवजावे तीर्थाची,
तुका म्हणे मायबापे,
अवघी देवाची रूपे !
पण परिस्थिती भयानक आहे आई एकीकडे राहते तर बाप दुसऱ्या भावाकडे राहतो. एका भावाने आईला वाटून घेतल्यावर दुसऱ्या भावाने बापाला वाटून घेतलं. अमिताभ बच्चनच्या आईच्या स्मरणार्थ एक कवी संमेलन घेण्यात आलं होतं एक कवी उठला आणि म्हणाला
बुढी मा को दो बेटे थे,
एक उपर रहता था,
एक नीचे रहता था,
बुडी मा 15 दिन उपर रहती थी,
15 दिन नीचे रहती थी,
जब 31 का महिना आता था,
तो बुढी मा भुकी रहती थी!
परिस्थिती फार भयानक आहे. माणूस जन्माला कसा आला हे विज्ञान सांगतो, माणूस जन्माला का आला? हे अध्यात्म सांगते. पुनरुत्पादन हा निसर्गाचा नियम आहे. आध्यात्म म्हणजे काय? मी सापाचं विष उतरतो आणि महाराज तूम्ही माणसाचं विष उतरता. अध्यात्म म्हणजे साधं सरळ सोपं राहणं. अध्यात्म म्हणजे कनिष्ठंनी आणि ज्येष्ठाचा आदर करणे, अध्यात्म म्हणजे आई वडिलांचा मानपान करणे, अध्यात्म म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे, अध्यात्म म्हणजे गरजूला मदत करणं, अध्यात्म म्हणजे दिलेली नोकरी, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी -पदाधिकारी, नेता आदीने कार्य प्रामाणिकपणे करणं. अध्यात्म म्हणजे मी कुणाला न फसवण, अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथ वाचन. ग्रंथ समजला म्हणजे संत समजतो आणि संत समजला म्हणजे भगवंत समजतो. ग्रंथ, संत व भगवंत हे त्रिसूत्री कार्यक्रम आहे. तुम्ही माझा सत्कार केलात सत्कार म्हणजे शालीचा ढीग हाराचा ढिग घेऊन येत नाही एक आचारसंहितेचे ओझही घेऊन येतो. जान, भान आणि मान. परवा दिल्लीला मी राष्ट्रपतींना भेटलो, पंतप्रधानांना भेटलो सर्पदंषाच्या कार्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली. साप चावतो गरिबाला, मोठ्यांना थोडाच चावतो? त्यांच्याकडे धड पैसे राहत नाहीत, अंधश्रद्धा राहते. सर्पदंश झालेल्या 10 महाराजांना जिवनदान देण्याचे भाग्य मला लाभले, त्यांना मी सांगितलं तुमच्याकडून मी फीस घेत नाही परंतु तुमच्या प्रवचनामधून अंधश्रद्धेवर प्रहार करा. एखाद्याला साप चावला तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जा भोंदू बाबा कडे जाऊन स्वतःचा जीव देऊ नका. केंद्र सरकारने मी जीवनदान दिलेल्या एका महाराजांचा माझ्याकडून व्हिडिओ मागितला व नाग चावलेल्या महाराजांचा व्हिडिओ केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. महाराजांच्या शब्दात ताकत असते इथं हजारो लोक आहेत तुम्ही जर सांगितलात साप चावला तर भोंदू बाबाकडे जाऊनका व आपला जीव गमावू नका. साप 80 टक्के बिनविषारी असतात 20% विषारी असतात. प्रतिविष हाच त्याला उपाय आहे. आम्ही प्रसार करतोच पण आपणही करा. हे महाराजांनी केलं तर खूप मोठं समाजकार्य होऊ शकते. माजी खासदार स्व .भाई केशवराव धोंडगे साहेब मला नेहमी आठवतात की त्यांच्या साहित्य संमेलनाला अध्यक्षांच्या तोंडाला ते मुंगसे बांधायचे. त्याचा उद्देश ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज आपणच व्हावा हाच त्यांना संदेश द्यायचा होता. व्हॉइस ऑफ व्हाईस लेस. आज खेडी सुधारत आहेत. आठवणीचा ठेवा, आठवणीत ठेवा, आजच्या आठवणींना वाटो, कालच्या आठवणींना हेवा. पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या हातून गुंटूर येथील शीतल उप्पे नावाची मुलगी वाचली असे अनेकांनी सांगितले. गोणार गावातील दहा वर्षाच्या मुलाला मन्यार चाललेला प्रसंग सांगताना पुंडे साहेब म्हणाले की, माझ्याकडे त्या मुलाला आणले गेले तो डेड आहे असे सांगितले. मी टेम्पोमध्ये जाऊन त्याची चौकशी केली त्याला 42 तास व्हेंटिलेटर टाकून त्याला वाचवले. आग्रहानंतर त्याच्या लग्नाला मी घरी गेलो होतो तेव्हा माझा फोटो देव्हार्यामध्ये त्यांनी ठेवला होता. त्यांना मी सांगितलं फोटोला आताच हार घालू नको मला आणखी बऱ्याच रुग्णांना वाचवायचे आहे. हा प्रसंग ऐकून सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. गरीब माणूस पैसे कमी देत असेल पण डॉक्टरांना हृदयात ठेवतो हे नक्की. इतका तो प्रामाणिक असतो. मी एमडी झाल्याच्या नंतर खेड्यामध्ये आलो सगळे मला हसायचे मी आज ग्रामीण भागात आहे माझा खिसा रीकामा असेल पण हृदय पूर्ण भरलेले आहे. मी शहरात राहिलो असतो तर कदाचित माझा खिसा एवढा मोठा राहिला असता पण हृदय रिकामे राहिले असते. या सर्व कार्याचं श्रेय माझे आई-वडील, माझी पत्नी, माझे गूरुजन, साहेब तुमचा हतगून आणि आमचं नशीब म्हणणारे माझे सर्व रुग्ण याना सर्व क्रेडिट देतो. एकटा माणूस काहीही करू शकत नाही हे सामूहिक यश आहे. आणि शेवटी प्रार्थना करतो ‘अहंकाराचा रोग न लगो मजला’. अशाप्रकारे भावनिक भावना डॉ पुंडे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संग्राम शिंदे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच योगेश उपे, पत्रकार दादाराव आगलावे, पत्रकार मारुती चिलपिपरे, गंगाधर मुंडकर मोहनराव मुंडकर, साहेबराव चिलपिपरे, राजीव उपे, धोंडीराम गुंटुरे, गोविंदराव आगलावे, माधव मुंडकर, कांताराम आगलावे, यांच्यासह गुंटूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती यात्रा कमिटीचे सर्व सदस्य गावातील व परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

