दापका येथे बहिशाल व्याख्यानमाला संपन्न
मुखेड: (दादाराव आगलावे)
विधवांची दयनीय अवस्था पाहून म. फुले अस्वस्थ व्हायचे. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी पाठिंबा दिला. बालविवाह प्रथेवर त्यांनी कठोर टीका केली आणि स्त्रियांना शिक्षण व स्वातंत्र्य देण्याचा आग्रह धरला.अनाथ बालकांसाठी आश्रम सुरू करून त्यांनी मानवतेचा संदेश दिला.महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते.छ.शिवाजी राजे महाविद्यालय,उदगीर येथील प्रा. डॉ.सुरेश शिंदे यांनी ‘महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज’ या विषयावर बहिशाल व्याख्यानमालेचे दुसरे व्याख्यान पुष्प गुंफताना बोलत होते.
श्री संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) ता.मुखेड येथे ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेड व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, बहि:शाल व्याख्यानमाला संपन्न झाली.यावेळी वक्ते म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामीण महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ व्याख्याते डॉ. रामकृष्ण बदने, बहिशाल व्याख्यानमालेचे संयोजक प्रा. डॉ.मदन गिरी,प्रा.डॉ. सरोज गायकवाड,मुख्याध्यापक शिवाजी डावकरे,वसंत चव्हाण, बुद्धाजी किनवाड,दादाराव आगलावे,सतिष मस्कले, सुलिंदर गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजना नंतर व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली.प्रा.डॉ.शिंदे पुढे म्हणाले की,महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण व स्वातंत्र्य देण्याचा आग्रह धरला.अनाथ बालकांसाठी आश्रम सुरू करून त्यांनी मानवतेचा संदेश दिला.
प्रस्ताविक प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी करताना म्हणाले की, शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक जीवनात व्याख्यानमाला ही ज्ञानवृद्धीची, विचारप्रवर्तनाची आणि व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी माध्यमे आहेत.पुस्तकातील ज्ञानाला वास्तव जीवनाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य व्याख्यानमालेतून घडते.
मुख्या. शिवाजी डावकरे यांनी ही या वेळी मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ.देविदास केंद्रे यांनी अध्यक्षीय समोरोप करताना म्हणाले की,व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडील विषयांचे सखोल ज्ञान मिळते.विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ,अभ्यासक व विचारवंत आपले अनुभव व संशोधन मांडतात.त्यामुळे संत नामदेव महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांची दृष्टी व्यापक होते आणि विषयाची समज अधिक स्पष्ट होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सरोज गायकवाड यांनी केले तर प्रा.डॉ.मदन गिरी यांनी सर्वांचे आभार मानले.प्रारंभी श्री संत नामदेव महाराज विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे शाल,पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक मामा धुळेशेटे,लक्ष्मण तेलंगे,ओमकार तेलंगे,महेश पंजलवाड, शिवदर्शन पाखंडे,माधव दारशेवाड यांनी परिश्रम घेतले.

