कंधार | प्रतिनिधी
विवाह समारंभ हा केवळ कुटुंबाचा आनंदोत्सव न राहता तो समाजहिताचा उत्सवही ठरू शकतो, हे बहाद्दरपुरा येथील पेटकर परिवाराने कृतीतून दाखवून दिले. विवाहाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक नागरिकाचा विमा काढून सामाजिक उत्तरदायित्वाचा अनोखा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाची दखल थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली.त्यानंतर गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालय, बहाद्दरपुरा येथे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी परमेश्वर पेटकर व बाबुराव पाटील पेटकर यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. काळगे यांनी, “समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची भावना जपणारे पेटकर परिवार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत. अशा सामाजिक उपक्रमांतूनच सशक्त समाजाची उभारणी होते,” असे गौरवोद्गार काढले.देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून गौरव आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून झालेला सन्मान यामुळे बहाद्दरपुरा गावाची मान उंचावली आहे. पेटकर परिवाराचा हा सामाजिक उपक्रम केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याची भावना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच हनमंत पाटील पेटकर यांनी खासदार डॉ. काळगे व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय भोसीकर यांचा सत्कार केला.यावेळी शहराध्यक्ष सय्यद सलीम सय्यद रहीम, जिल्हा सरचिटणीस बसवेश्वर मंगनाळे, माधवराव गित्ते, तालुका सचिव सुरेश कल्लाळीकर, नगरसेवक प्रतिनिधी सचिन बसवंते, ग्रामविकास अधिकारी गिरी महाराज, माजी सरपंच बाबुराव आईनवाड, पोलीस पाटील शरद पोकले, शेख हैदर, शेख पाशा भीमराव कदम, राहुल पाटील पेटकर, फारुख शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विवाहाचा आनंद… समाजाच्या सुरक्षिततेसाठी!”
पेटकर परिवाराने विवाह समारंभाच्या निमित्ताने गावातील नागरिकांचा विमा काढून सामाजिक जबाबदारीचे वेगळे उदाहरण घालून दिले. या उपक्रमाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी *’मन की बात’*मध्ये घेतल्याने बहाद्दरपुरा गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले.

