कंधार :(दिगांबर वाघमारे )
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण जलधोरणामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्प उभारले गेले, पाणी साठवण क्षमता वाढली आणि मराठवाड्याच्या विकासाचा पाया मजबूत झाला. त्यामुळेच स्व. शंकरराव चव्हाण हे जलक्रांतीचे आधुनिक भागिरथ होते, असे प्रतिपादन कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी केले.
स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गऊळ (ता. कंधार) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय भोसीकर म्हणाले की, स्व. शंकरराव चव्हाण यांनी राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः मराठवाड्यातील जलसंपदा विकासासाठी त्यांनी राबविलेल्या योजना आणि प्रकल्पांमुळे या भागातील शेती, उद्योग आणि जनजीवनाला मोठा आधार मिळाला. विकासदृष्टी, प्रशासनातील पारदर्शकता आणि जनहिताची भूमिका ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. आजच्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सलीम सय्यद रहीम, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे, जिल्हा सरचिटणीस माधवराव गित्ते, तालुका सचिव सुरेश कल्लाळीकर, नगरसेवक प्रतिनिधी सचिन बसवंते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नन्हू पाटील गुट्टे, नागनाथ हेंडगे, माजी सरपंच गंगाधर कागणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम गऊळकर, मारोती पाटील जायभाये, उद्धव देवकांबळे, मुख्याध्यापक जे. एम. बयेवाड, बी. बी. गोंड, एच. एम. शिंदे, सौ. जी. एम. वडजे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

