कंधार, दि15 : प्रतिनिधी
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावर बसविण्यात आलेल्या लोखंडी डिव्हायडरची उंची तातडीने कमी करावी, अशी मागणी सेवा जनशक्ती पार्टीचे युवा आघाडी तालुका प्रमुख साईनाथ भगवानराव मळगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व कंधार नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि.14 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर मार्गावरील डिव्हायडरची उंची अनेक ठिकाणी अंदाजे पाच फूट असल्याने वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होत आहे. विशेषतः वळण घेताना रस्त्यावरील परिस्थिती स्पष्ट दिसत नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याउलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भागात सुमारे तीन फूट उंचीचा डिव्हायडर बसविण्यात आला असून तो वाहतुकीस अधिक सुरक्षित व अनुकूल असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरची उंची कमी केल्यास वाहनचालक, पादचारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
साईनाथ मळगे यांनी प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणे, सध्याची अंदाजे पाच फूट उंचीची लोखंडी जाळी कमी करून ती सुमारे तीन फूट उंचीची करणे आणि वाहतूक तज्ज्ञ व पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा तातडीने करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
ही मागणी कोणत्याही प्रकारच्या टीकेसाठी नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि लोकहिताच्या दृष्टीने करण्यात येत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


