काव्यपौर्णिमा कार्यक्रमास बितनाळ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;भर पावसात कवी कवयित्रींनी काव्याची केली बरसात


नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पंचेचाळीसाव्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमास बितनाळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून बुद्ध विहाराच्या प्रांगणात कविसंमेलनास सुरुवात झाली आणि पाऊस सुरु झाला.  पडत्या पावसाला साद घालीत एकेक कविता रंगत आणीत होती. भर पावसात कवी कवयित्रींनी काव्याची बरसात केली. जलथेंबांच्या अंतरंगात कविता जन्म घेत होती आणि उपस्थितांच्या मनात प्रसवत होती. या आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवयित्री बालिका बरगळ या होत्या तर अतिथी कवयित्री म्हणून छाया भालेराव, प्रा. डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, चांगोणा गोणारकर, सिंधुताई दहीफळे, छाया कांबळे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. 


                येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान आणि भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेकडून उमरी तालुक्यातील बितनाळ येथील पंचशील बुद्ध विहारात ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथवाचनाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पंचेचाळीसावी काव्य पौर्णिमा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन संपन्न झाले. पंचशील त्रिसरण ग्रहण करण्यात आल्यानंतर प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांचे माय तुझा ओलावा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. दरम्यान, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील आठ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. काव्यपौर्णिमेत गौतम कांबळे, छाया भालेराव, बाबुराव पाईकराव यांनी काव्यवाचन केले तर अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, रणजीत गोणारकर, छाया कांबळे, बालिका बरगळ, लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सिंधुताई दहीफळे, दत्ताहरी कदम, पांडूरंग कोकुलवार, भैय्यासाहेब गोडबोले, चांगुणा गोणारकर, एन.सी. भंडारे आदी कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागोराव डोंगरे यांनी तर पंचेचाळीसाव्या काव्यपौर्णिमेची प्रस्तावना गंगाधर ढवळे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी कैलास धुतराज यांनी केले तर काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र गंगाधर ढवळे यांनी हाती घेतले. आभार संयोजक नागोराव डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतराम डोंगरे, संजय नारायण डोंगरे, संभाजी डोंगरे, बारकाजी डोंगरे, लक्ष्मण ज.डोंगरे, संजय गं.डोंगरे, गणेश डोंगरे, गंगाधर लोखडे, विश्वभर लोंखडे, यशवंत शेवाळे, प्रकाश डोंगरे, साहेबराव तुरेराव ,राहुल जाधव, अशोक जाधव यांनी परिश्रम घेतले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गावातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांना भोजनदान देण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *