सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती असणे आवश्यक – जिल्हा न्यायाधीश सलगर ; पानभोसी येथे कायदेविषयक शिबीर

कंधार : कायदा सर्वांसाठी असतो. विशेष करून महिला, मुले, जेष्ठांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होते. त्यांना न्याय मिळतो. कायद्याची माहिती नसल्यामुळे पक्षकारांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर सारण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती असणे आवश्यक असल्याचे कंधारचे जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर यांनी सांगितले.


तालुक्यातील पानभोसी येथे दि. ९ रोजी तालुका विधिसेवा समिती व अभिवक्ता संघाच्यावतीने कायदेविषयक शिबीर पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, गटविकास अधिकारी मांजरमकर, सरपंच सौ. राजेश्रीबाई भोसीकर, मनोहरराव भोसीकर, लोह्याचे पोनि. तांबे, सहायक सरकारी वकील महेश कागणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हा न्यायाधीश सलगर म्हणाले की, सद्या अनेकजण आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत. यामुळे वयस्कांना जीवन कंठीत करणे अवघड होतं आहे. मुलगा असो की मुलगी त्यांना आईवडिलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. ही जाचक प्रथा दूर करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आईवडिलांना सांभाळले नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात पोटगी मागण्याचा अधिकार आहे. न्यायालय सर्व खातरजमा करून जेष्ठांना पोटगी मंजूर करते. असे अनेक कायदे आहेत.

या कायद्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी अड. दिलीप कुरुडे, अड. बाबू पाटील, अड. रवी केंद्रे, अड. सागर मुखेडकर, अड. गजानन बनसोडे, अड. सागर डोंगरजकर ग्रा. प. सदस्य शे. ताहेराबी रसुलसाब, सौ. सुमनबाई जोंधळे, शे. सय्यद ताजोद्दीन साब, विशंभर डुबुकवाड, शे.रहीमसाब, पो. पाटील शेख, ग्रामसेवक परमेश्वर वाडीकर, हरिहर गोंड, एजाज रहीमसाब, नीलकंठ डोंब, रमाकांत जोंधळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *