जबाबदार नागरिकत्वाची भूमिका हीच खरी संविधानाची सेवा – विनोद रापतवार

जिल्हा ग्रंथालयात संविधान दिन साजरा

नांदेड :- भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचे अधिकार बहाल केले असून एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकत्वाची अपेक्षा ठेवलेली आहे. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्याची परिपूर्ण अमंलबजावणी होणे म्हणजे एक प्रकारे देशाला सक्षक्त करण्यासारखे आहे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले .

संविधान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, सेतू समिती अभ्यासिकेचे ग्रंथपाल बाळू पावडे, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे पाटील सर, शिवाजी पवार , संजय पाटील, गजानन कळके, रामतीर्थकर, आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर आधारित जिल्हा ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रगल्भ लोकशाहीसाठी विद्यार्थी, युवक मोठे योगदान देवू शकतात. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना एक नागरिक म्हणून,युवक म्हणून आपल्याकडूनही देशासाठी काय योगदान देता येईल यासाठी सद्भावना तेवढ्याच मोलाच्या आहेत. विविध आंदोलनातून भारतातील युवकांनी आपली भूमिका व कर्तव्य वेळोवेळी चोख बजावले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांनी आरोग्याच्या सुरक्षितेसाठी जे जबाबदार वर्तन ठेवले ते लाख मोलाचे होते असेही जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी सामूहिक वाचन करण्यात आले. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन गजानन कळके यांनी केले तर आभार शिवाजी पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *