ना.अशोकराव चव्हाण यांनी दिली विकासाला गती 300 खाटांच्या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयास मान्यता


नांदेड ; भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विकासाला ब्रेक लागला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ना. अशोकराव चव्हाण यांनी विकासाला गती दिली असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या कार्यरत असलेल्या 100 खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रुपांतर आता 300 खाटांच्या रुग्णालयात होणार असुन यासाठी भव्य अशा इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे.


यापूर्वी स्टेट बँकेचे विभागिय कार्यालय, वरिष्ठ वास्तु कार्यालय, कार्यकारी अभियंता दक्षता गुणनियंत्रण विभाग, जिल्हा व क्षत्रिय प्रयोग शाळा कार्यालय आदि विविध कार्यालयानंतर आता 100 खाटा असलेल्या रुग्णालयास आता 300 खाटांचे श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. याच ठिकाणी नवीन भव्य इमारतीत हे रुग्णालय रुपांतरीत होणार आहे.


डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी येथे स्थलांतरित झाल्यानंतर शहरातील रुग्ण तसेच नातेवाईकांची गैरसोय होत होती. सामान्य रुग्णांना विष्णुपुरीला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. येथील सामान्य जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पूर्वी शहरात असलेल्या ठिकाणीच भव्य रुग्णालय व्हावे अशी मागणी शहरवासियांची होती.

दरम्यानच्या काळात कोविडसाठी भव्य नवीन इमारतीत 200 रुग्णांना उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली होती.जुनी मोडकळीस आलेली इमारत पाडण्याचा प्रस्ताव होता.तो शासनाने मंजूर केला.आता याच ठिकाणी ही भव्य वास्तू उभी करण्यात येणार आहे.अशोकराव चव्हाण यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्यास यश आले असून आता शहरातच जुन्या श्री गुरु गोविंदसिंघजी रुग्णालयाच्या ठिकाणीच 300 खाटांचे नवीन सर्व अद्यावत आरोग्य सुविधा असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयास शासनाने मान्यता दिली आहे. या रुग्णालयामुळे विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयातील रुग्णांची गर्दी कमी झाल्याने तेथील ताणही कमी होणार आहे.

300 खाटांच्या मुख्य इमारत आंतररुग्ण विभागाचे 31162.62 चौरस मीटर बांधकाम करण्यासाठी 138.21 कोटी किंमतीच्या अंदाज पत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
गत भाजप सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातील जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष तसेच प्रलंबित प्रश्न गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विकासाला गती दिली आहे.

नांदेड सह जिल्ह्यातील विविध तालुक्यातीलही प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यसाठी ते प्रयत्न करीत आहेत.समृद्धी मार्ग नांदेडला जोडल्या गेल्याने मुंबईला कमी वेळात पोहचणे शक्य होणार आहे. या समवेतच या समृद्धी मार्गासाठीची जागा अधिगृहित करतांना भविष्यातील बुलेट ट्रेनच्या मार्गाचेही नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. जे चांगले विकासाचे प्रोजेक्ट आहेत ते जिल्ह्यात यावेत यासाठी ना. अशोकराव चव्हाण यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत .आता 300 खाटांच्या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयास मान्यता दिल्याने येथील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. विकासाच्या या धडाक्याने ना. अशोकराव चव्हाण यांचे नांदेडकरांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *