फुलवळ येथे बस निवाऱ्या अभावी प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांची हेळसांड..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड आणि कंधार-उदगीर या तालुक्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी आले असून आता नक्कीच येथून वाहनांची व प्रवाश्यांची वर्दळ तर मोठ्या प्रमाणावर वाढलीच आहे परंतु येथून दररोज शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असून येथे प्रवाश्यांसाठी मात्र बस निवारा नसल्याची खंत अनेक दिवसांपासून जाणवत असून प्रसार माध्यमातून ने नेहमीच त्यासाठी पाठपुरावा केला आहे , आता वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करता येथे बस निवाऱ्याची नितांत गरज असून या बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

फुलवळ हे जिल्हा परिषद गटाचे गाव असून जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या गावात अन्य काही शासकीय कार्यालये आहेत मात्र येथे बस निवारा अद्याप उभारला गेला नाही ही खेदाची बाब आहे. तसे पाहता कोणतीही निवडणूक आली की भल्या भल्या राजकारण्यांना फुलवळ ची फार ओढ लागलेली असते त्यामुळे ते मोठ्या अस्तवाईकपणे फुलवळ मध्ये आल्यावर भाषणातून मोठमोठ्या घोषणा देतात आणि मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमच्या ज्या अडचणी असतील त्या बिनधास्तपणे सांगत जा त्या आपण नक्की सोडवू असे पोकळ आश्वासन ही दिले जातात आणि वरून निवडणूक काळापुरते गोड बोलत एवढी वेळ आपण सर्वांनी माझ्यासोबत राहून एकदा सहकार्य करावे अशी माझी ईच्छा आहे असे प्रांजळपणे बोलून जातात . आणि भोळी भाबडी जनता भूलथापांना बळी पडून भरकडून जाते.

वास्तविकता मात्र काही वेगळीच असते कारण आज घडीला फुलवळ हे कंधार तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व मतदार संख्या असलेले जिल्हा परिषद गटाचे गाव आहे. तरीपण या गावाचा म्हणावा तसा विकास अद्यापही झालाच नाही. एम आय डी सी तर आहे . परंतु तेथे कोणते मोठे उद्योग नाहीत , त्यामुळे तरुण बेरोजगारांना काम नाहीत . एवढे मोठे गाव असून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही , येथे बी एस एन एल चे कार्यालय आहे परंतु सुविधा नाहीत. गाव मुख्य रस्त्यावर आले परंतु बाजारपेठ नाही. अशा अनेक कमतरता आहेत.

सध्या तरी येथून दोन प्रमुख रस्ते जात असल्यामुळे प्रत्येकांना आता आपला व आपल्या गावाचा विकास होईल , काही ना काही छोटे मोठे व्यवसाय , धंदे चालतील अशी आशा सर्वांनाच लागली आहे . येथील बसस्थानक शेजारी बरेचशे अतिक्रमण काढत रस्त्याचे एकाच बाजूने का होईना पण रुंदीकरण ही करण्यात आले आणि रस्त्याचे व नालीचे काम ही पूर्ण करण्यात आले. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र अद्यापही रस्ताही झाला नाही आणि नाली पण झालीच नाही हे मात्र खेदाची बाब असून यावर कोणीही लक्ष घालायला तयार नाही ही बाब खेदजनक असल्याच्या भावना बोलून दाखवल्या जात आहेत.

येथे प्रवाश्याना ना बसण्याची व्यवस्था आहे ना सार्वजनिक शौचालय-मुतारी . त्यामुळे प्रवाश्यांची चांगलीच हेळसांड होत. शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना तासंतास तासनतास ताटकळत रस्त्याच्या बाजूला उभे राहावे लागत आहे. तेंव्हा येथे बसनिवाऱ्याची नितांत गरज असून संबंधितांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून येथे बसनिवारा उभारावा तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत व ज्या-ज्या अभावाने गावाचा विकास खुंटला आहे त्या-त्या कामाला चालना देत गावविकासाला चालना द्यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *