अवकाळी पावसाच्या धास्तीने वीट उत्पादक व हळद उत्पादक शेतकऱ्यांना भरली धडकी …!

 

कंधार : (विश्वांभर बसवंते )

सध्या हळद पीक काढणीला वेग आला असून हळद उत्पादक शेतकरी हळद पीक काढून ती शिजवून सुकवण्यात व्यस्त आहेत, तर वीट उत्पादक मालक आपल्या मजुरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीट तयार करून त्या सुकविण्यासाठी धडपडत असताना अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे याचा परिणाम आपल्या उद्योगावर होऊन आपले भविष्यात फार मोठे नुकसान होते की काय? अशी धडकी हळद उत्पादक व वीट भट्टी उत्पादकांना भरली असल्याचे दिसून येत आहे.

 

गेल्या मार्च महिन्यात दि.१६ व १७ तारखेला अवकाळी पावसाने दर्शन देऊन गारा मिश्रित पावसाच्या माध्यमातून गहू, हरभरा, करडई, ज्वारी, भाजीपाला, आंबा व वीट उद्योगांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही आर्थिक दृष्ट्या संकटात सापडून हातबल झाले आहेत. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भोळाभाबडा शेतकरी निसर्गाकडे हात जोडून प्रार्थना करत आहे.

गत मार्च महिन्यातील १६ ते १७ तारखेचे नैसर्गिक संकट गेले म्हणून कशीबशी सावरा सावर करत शेतात काढणीला आलेले हळद पीक व ज्वारी उरला सुरला गहू काढणीला वेग आला आहे. शेतमजुरांची मनधरणी करून गहू, उन्हाळी ज्वारी व हळद काढून ती शिजवून सुकविण्यासाठी शेतकरी राजा डोळ्यात तेल घालून दिवस रात्र या कामी परिश्रम करत असल्याचे दिसून येत आहे.

‌‌ त्यातच पुन्हा हवामान खात्याने दि.१० एप्रिल २०२३ पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे विशेषतः हळद उत्पादक शेतकरी व वीट उत्पादकांनी भविष्यात होणाऱ्या अवकाळी पावसाची धास्ती घेत सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या हळद पिक व कच्च्या विटा एकत्र गोळा करून झाकून ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी मजुरांसह मालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *