कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या वर्षा भोसीकर या केवळ एक व्यक्ती नाहीत, तर समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारी विचारधारा आहेत. सामाजिक बांधिलकी, स्त्रीसक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण आणि आपत्तीतील मदत अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
वर्षा भोसीकर यांनी समाजकार्याची सुरुवात कोणत्याही मोठ्या पदाच्या बळावर केली नाही. त्यांनी सुरुवात केली ती संवेदनशील मनाने. समाजातील वेदना जवळून पाहून त्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. २००७ साली कंधार पंचायत समितीच्या पहिल्या महिला उपसभापती म्हणून निवड होणे हा त्यांच्या सामाजिक कार्याचा केवळ प्रारंभ होता.
महिला नेतृत्व म्हणजे केवळ पद धारण करणे नव्हे, तर महिलांच्या प्रश्नांना स्वतःचे प्रश्न समजून त्यासाठी लढणे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. ग्रामीण महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांना आर्थिक व मानसिक बळ देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.
२०१३ मध्ये फुलवळ येथे कुपोषणाने ग्रासलेल्या ३३ बालकांना दत्तक घेऊन अवघ्या एका वर्षात त्यांना कुपोषणमुक्त करणे, हा त्यांच्या कार्यातील एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम ठरला. मातृत्व, करुणा आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम त्यांच्या या कार्यातून दिसून येतो.नागलगाव, पोखर्णी आणि सोमठाणा या गावांमधील २५ ते ३० वर्षांपासूनची पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागू नये, यासाठी त्यांनी विविध योजना राबवून पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था उभी केली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत फुलवळ परिसरात तब्बल चार हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून त्यांनी स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजवला. स्वच्छता म्हणजे आरोग्य आणि आरोग्य म्हणजे सशक्त समाज, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून लोकांपर्यंत पोहोचवला.आरोग्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आरोग्य संवाद व आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून पानशेवडी आरोग्य केंद्रांतर्गत दहा हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम राबवून त्यांनी अनेक कुटुंबांचे जीवन सुरक्षित केले.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी गरजू व बेरोजगार कुटुंबांना धान्य, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून मदतीचा हात दिला. त्या काळात त्यांनी अनेक कुटुंबांना आधार देत माणुसकीचे खरे रूप समाजासमोर आणले.
कंधार येथील स्वप्नभूमी परिसरात वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दोन मुलांचे पालकत्व स्वीकारणे हा त्यांच्या माणुसकीचा आणखी एक हृदयस्पर्शी अध्याय आहे. दुःखाच्या काळात दिलेला आधार हीच खरी समाजसेवा आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
पर्यावरण संवर्धनासाठीही त्यांनी फुलवळ सर्कलमध्ये हजारो वृक्ष लागवड करून पुढील पिढ्यांसाठी हिरवे भविष्य निर्माण करण्याचा संदेश दिला. तसेच शाळा व अंगणवाडी खोली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, दलितवस्ती सुधारणा, ग्रामीण रस्त्यांसाठी निधी मिळवणे अशा विविध विकासकामांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.त्यांच्या या निःस्वार्थ आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दैनिक चालु वार्ता परिवाराने त्यांना ‘दैनिक चालु वार्ता समाजरत्न पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित केले आहे. हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून समाजसेवेच्या विचारधारेचा गौरव आहे.सौ. वर्षा संजय भोसीकर यांचा प्रवास सांगतो की समाज बदलण्यासाठी पद, पैसा किंवा प्रसिद्धीची गरज नसते. गरज असते ती संवेदनशील मनाची, निःस्वार्थ भावनेची आणि कृतीची. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे आणि समाजसेवेचा हा प्रकाश पुढील पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे.
– महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम.

