डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन ; राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


नांदेड –

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून येथील डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या दवाखान्यात ते उपचार घेत होते.

त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

त्यांना निमोनिया झाला होता. उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.


             त्यांच्या जाण्याने लिंगायत समाजात शोककळा पसरली आहे. महाराज लिंगायत धर्माचे खंदे समर्थक होते. शुक्रवारी २८ तारखेला महाराज समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. अहमदपूर येथील भक्तीस्थळावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

यावर महाराजांनी माझी प्रकृती चांगली असून समाधीला अजून वेळ असल्याचे सांगितले होते.

५० कोटींच्या संपत्तीवरून त्यांना संजीवन समाधी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार झाला याबाबत अॅड सतीश तळेकर यांनी पोलीस, गृहविभागाकडे तक्रार केली होती.

महाराजांचा अनेक दिवसांपासून अन्नत्याग सुरू होता. 

                 शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनीही तक्रार केली होती. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना समाधी घेण्यास प्रवृत्त करणाऱ्याचा बंदोबस्त करणार असेही धोंडे म्हणाले आहेत. आज महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह भक्तीस्थळी ठेवण्यात आला आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता.

आप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

—–
 *** राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आताच लिंगैक्य झालेत, मृत्यूसमयी ते १०४ वर्षाचे होते गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.—


चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पा लिंगेक्य झालेत


राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे, दरम्यान डॉ व्यंकटेश काबडे यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. अहमदपूरकर महाराज यांच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर खूप कमी झाला होता. तसेच श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असल्याचे ते म्हणाले

—–
***दरम्यान लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे  नागरिकांना  विशेष आवाहन!


राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दु:खद निधन झाले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अहमदपूर येथे आजच त्यांच्यावर शासकीय इतमामात विधीवत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये, ही नम्र विनंती. याच फेसबुक पेजवरून अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

——–

****मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

मुंबई ;
धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आह


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.  विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी  मार्गदर्शक असेच आहे.

शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

——-

***उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीराष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज श्रद्धांजली

 मुंबई : प्रतिनिधी   

 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारं ऋषीतुल्यं व्यक्तिमत्वं होते. समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं. ते सोबत नसणं ही राज्याच्या, देशाच्या सामाजिक, आध्यात्मिक चळवळीची मोठी हानी आहे. महाराजांच्या लाखो भक्तांवर आज दु:खाचा डोंगर कोसळला असून आम्ही सर्वजण या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण केली.   

         उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवलेले मराठवाड्यातील पहिले डॉक्टर होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशाच्या, समाजाच्या, मानवतेच्या कल्याणासाठी अर्पण केलं. त्यांचं कार्य अखंड मानवजातीच्या कल्याणाचं कार्य होतं म्हणूनच ते राष्ट्रसंत ठरले. महाराजांनी दिलेले विचार, केलेलं कार्य पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

—–

**** महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली – पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड;

“वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले.

सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दिप आता मालवला आहे” या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

नांदेड येथील डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्प‍िटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *