आपट्याची पानं

 

दसरा आला की आपण आपट्याचं पानं सोनं म्हणून एकमेकांना दिल्या घेतल्याशिवाय दसरा साजरा करत नाही. पण ते अनेकदा आपट्याचं पान नसतंच. मुळात शमीच्या पानांला ऑप्शन म्हणून आपटा आलाय. आता सोनं वाटण्याच्या या प्रथेलाच ऑप्शन शोधावा लागणार आहे.
वर्षभराच्या सणांमध्ये दसरा हा एक मोठा सण आहे. सण जितका मोठा तितके त्याचे रितीरिवाज जास्त. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा, हत्यारांची पूजा, देवीचे विसर्जन, रावणाचे दहन,धम्मचक्र परिवर्तन दिन, हल्लाबोल, सीमोल्लंघन म्हणून सैनिकांसाठी महत्त्वाचा… याच दिवशी कुष्मांड दशमीचं व्रतही केलं जातं. अश्या विविध रितीभाती घेऊन हा सण येतो.
आता राजेरजवाडे नाहीत त्यामुळे कुणाला दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्याची गरज उरलेली नाही त्यामुळे सीमोल्लंघनाचा प्रश्न उरत नाही. आपल्याकडे ढाली तलवारी नाहीत त्यामुळे ही ती पुजण्यालाही अर्थ उरलेला नाही. घरातल्या चाकूसुऱ्यांना, मिक्सर, वॉशिंग मशीनना हळदीकुंकू लावून पुजण्यात आपण समाधान मानतो. ऑफिसात कम्प्युटर, लॅपटॉप हत्यारांच्या जागी पुजले जातात. आता पाटीही नाही म्हणून पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजन करण्याचंही नव्या पिढीला माहीत नाही. कोहळीची फुलं मिळत नसल्यामुळे कुष्मांड दशमीचं व्रतही आऊटडेटेड झालंय. त्यामुळे घराघरात करण्यासाठी दसऱ्याची एकच गोष्ट उरलीय, ती म्हणजे सोनं वाटणं त्याला पर्याय म्हणून वापरण्यात येते ती आपट्याची पानं
आपट्याच्या पानांविषयी परंपरा नेमकं काय तर दसऱ्याच्या निमित्ताने नातलगांनी, स्नेहीमंडळींनी आपट्यांची पाने सोने म्हणून देवाण घेवाण करणे.
पौराणिक कथांमधे अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रं शमी वृक्षावर लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाची पाने वाटण्याची प्रथा सुरू झाली. त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देतो. शमीच्या जागी आपटा आला. या सगळ्या पुराणांतल्या गोष्टींत शमीच्या झाडाचाच उल्लेख आहे. मग त्यात आपटा कसा आला तर शमी वृक्ष सर्वत्र उपलब्ध होऊ शकेलच याची कल्पना नसल्यामुळे आपट्याच्या वृक्षाची पूजा करावी, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. परिणामी आपट्याच्या पानांचं सोनं एकमेकांना देण्याची प्रथा सुरू झाली.
बाभूळी वर्गातलं हे झाड औषधी आहे. त्याचा आयुर्वेदात उल्लेख आहे. राजस्थानात या झाडाला जेखडी असं म्हणतात. तो राजस्थानाचा राज्यवृक्ष आहे.
हा शमी सगळीकडे नसल्यामुळे आता त्याची जागा आपट्याने घेतली असली तरी पण आता आपटा तरी कुठे सगळीकडे मिळतो. त्यामुळे शहरांमधेच नाही तर गावांमधेही तो सर्रास विकत घेतला जातो.
आपट्याविषयी आपल्याला हे ही थोडं माहीत हवं की,
आपटा हे अस्सल भारतीय झाड आहे. ते आपटा हे फॅबेसी कुळातील बहुहिनिया जातीतील शेंगा देणारं, भरपूर लोंबत्या फांद्याचं, वेडंवाकडं वाढणारं झाड आहे. ते भारताबरोबरच श्रीलंका आणि चीनमधल्या पानझडी जंगलांमधे आढळतं.
संस्कृतमधे आपट्याला अनेक नावं आहेत.त्यातीलच एक नाव ‘अश्‍मंतक’ म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळ्या जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात. कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात. अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. आपट्याचं लाकूड मजबूत आणि टिकाऊ असतं. पण झाडं लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारं, हत्यारांचे दांडे वगैरे तयार करण्यासाठी होतो. त्याचं इंधन म्हणून ते फारच चांगलं असतं. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम आणि स्फुरद अशी संयुगं असतात. त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते.
जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून आणि टिकाऊ दारे बनवतात.पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे विड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या .बांधावर ही झाडे लावावीत, असं जुन्या ग्रंथात सांगितलं आहे. ही झाडं खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळं खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्‍चित राहतात. या छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो.`
वर्षभर आपट्याच्या झाडांना कुणीही विचारत नाही. पण दसऱ्याच्या एकाच दिवशी त्याचं मार्केट अचानक फोफावतं. पण बाजारात जी पाने आपट्याची म्हणून विकली जातात ती सगळीच आपट्याची पानं नसतात. बोहिनिया प्रकाराच्या सगळ्याच झाडांची पानं सारखीच दिसतात. विशेषतः कांचनच्या विविध जातींची पान आपट्यासारखीच दिसतात. त्यामुळे आपटा समजून अश्या सर्वेच झाडाचा बळी जातो पण बारकाईने पाहिलं तर दोन झाडांच्या पानांमधला फरक समजू शकतो.
आपट्याच्या झाडाचं रक्षण व्हावं म्हणून दसऱ्याला आपट्याशी जोडलं असावं.पण जर का असंच चालू राहिलं तर आपट्यांची पाने लुटायलाच नाही, तर बघायलाही सापडणार नाही. त्यामुळे वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते आपटा वाचवण्याचं आवाहन करत आहेत. दसऱ्याला आपटा वाटण्याऐवजी आपट्यांची झाडे लावून किंवा एखादे रोप आदान प्रदान करून हा सण साजरा करता येऊ शकतो का ते पहावे.
याची आणखी एक वाईट बाजू सांगता येईल, या झाडाची पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत, म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी पैशाचा गल्ला घेऊन आपल्या घरी निघून जातात.
अश्या तऱ्हेने कळत- नकळत बाजारात कचरा करण्यास आपणच कारणीभूत होतो. याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.
प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे. मी व माझ्यासारख्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक सुजाण नागरिकांनी मागील काही वर्षापासून सोने म्हणून आपट्याची पाने देणे-घेणे बंद केले आहे. चला या दसऱ्यापासूनच तुम्ही पण त्याची सुरवात करा व एक आदर्श विचार समाजात पसरवण्याचा प्रयत्न करा.
सर्वांना दसराच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *