नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पावले उचलण्याच्या सूचना; खा. अशाेकराव चव्हाण यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थिती, शेती नुकसानीचा आढावा

नांदेड, दि. 2 ः नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीबाबत आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहाेत. जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासनाच्या तातडीच्या बैठका घेऊन सर्व संबंधितांना नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी आज येथे दिली.
नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु आहे. सोमवारी तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. या पार्श्वभूमीवर खा. अशाेकराव चव्हाण यांनी सांगितले, की आज आपण जिल्ह्यातील पूरस्थिती आणि नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर सायंकाळी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरातील पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासन, महापालिका, महसूल, विद्युत विभाग आदींनी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचा निवारा व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले असून सोमवारी रात्री देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने गस्त घालून परिस्थितीवर नजर ठेवावी असे निर्देशही दिल्याचे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांचा जलस्तर कमी करण्यासाठी तेलंगणातील पोचमपाडसारख्या प्रकल्पांचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी आपण केल्याचेही खा. चव्हाण यांनी नमूद केले.
दरम्यान, आज दिवसभर नांदेड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील नागरिकांनी आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. त्यासंदर्भात आपण स्वतः जिल्हा प्रशासनाला अवगत केले. भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर व मुदखेड या दोन तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून, आवश्यक तिथे मदत पथके पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचेही खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *