प्रतिनिधी, कंधार
मागील पाच दिवसांपासून कंधार तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. शुक्रवार, दि. २५ जुलै सकाळी व रात्री पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मागील २४ तासांत कंधार तालुक्यांमध्ये ३५.५० मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे, बंधारे, प्रकल्प व तलावांची पाणीपातळी वाढली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण २६८.४० मीमी पाऊस झाला आहे.
तालुक्यात जून महिन्यात कमी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी कमी पावसावर खरीपाची पेरणी केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. यामुळे खरीपाची कोवळी पिके धोक्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हलका स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र हुमणी किडीचा सोयाबीन पिकांवर प्रादुर्भाव झाला. तर कापसावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
मागील पाच दिवसांपासून कंधार तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. शुक्रवार, दि.२५ जुलै सकाळी व रात्री पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मागील २४ तासांत कंधार तालुक्यांमध्ये ३५.५० मीमी पावसाची नोंद झाली आहे. कंधार महसूल मंडळात ४४.०, कुरूळा ३३.५, फुलवळ ३८.८, पेठवडज ३२.३, उस्माननगर ३४.०, बारूळ ३२.३, दिग्रस बु ३५.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात सर्वाधिक पाऊस कंधार मंडळात, तर सर्वात कमी पाऊस पेठवडज व बारुळ मंडळात झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण २६८.४० मीमी पाऊस झाला आहे.
प्रकल्प व तलावांचा पाणीसाठा वाढला
या पावसामुळे मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्पांसह सिंचन तालाव, पाझर तलाव, ल.पा तलाव, साठवण तलाव, मालगुजारी तलावांचा पाणीसाठा वाढला आहे. विहिरी, हातपंप व बोअरवेलची देखील पाणीपातळी वाढली आहे. तसेच मन्याड नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर मन्याड नदी दुथडी भरून वाहू शकते.
काही तास वाहतूक ठप्प
कंधार-बारुळ या महामार्गावर असलेल्या मानसपुरी येथे पुराचे पाणी पूलावरुन वाहू लागले होते. त्यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
दिवस व रात्रभर पाऊस
कंधार तालुक्यात दिवस व रात्रभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे सरकारी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची, शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.
विद्युत पुरवठा खंडित
तालुक्यात रात्रभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

