कंधार : दिगांबर वाघमारे
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तातडीने कंधार तालुक्यातील गुंडा, लिंडा, हाळदा, काटकळंबा, कौठा आदी गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
या आपत्ती संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनाशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
ढगफुटीमुळे नंदनवन चिखली, सावळेश्वर, औराळ, मंगलसांवगी, दाताळा, आलेगाव, शिराढोण, दिंडा, गुंडा, कौठा, बारूळ, तेलूर, येलूर, काटकळंबा, जोमेगाव, उमरा, धनज खुर्द, लाडका आदी गावांमध्ये पाणी घरामध्ये शिरल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, घागरदरा–बहादरपूरा पुल, मानसपुरी पुल, तसेच लाठ खुर्द पुल पाण्याखाली गेल्याने फुलवळ–आंबुलगा–मुखेड, बाचोटी–बारूळ–गडगा मार्ग बंद झाले आहेत. लिंबोटी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून अप्पर मानार प्रकल्प 100% भरल्याने शांतीघाट–क्रांतिभुवन बहादरपूरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, जनावरांची व कुटुंबाची सुरक्षितता जपावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


