कंधार प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बारूळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना धीर देत म्हटले की, “नागरिकांनी खचून जाऊ नये, प्रशासन व महायुती सरकार आपल्या मागे खंबीरपणे उभे आहे. तात्काळ मदतीच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटाला आपण सर्वजण मिळून मात करू.”
गेल्या २४ तासांपासून झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनेक नदी-नाले, तलाव तुडुंब भरले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतातील उभे पिक व शेतीची जमीन पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे.

बारूळ धरण परिसराची पाहणी करून चिखलीकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले. तेलूर गाव पूर्णपणे पाण्याने वेढले असल्याने गावकऱ्यांना बारूळ येथील श्री नामदेव महाराज मठ संस्थान येथे स्थलांतरित करण्यात आले असून संस्थानकडून त्यांची सोय केली जात आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम बोडलवार, शंकरराव नाईक, मारुती पाटील मजरे, ढिकले गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
—
काँग्रेसचे संजय भोसीकर यांची पुरग्रस्तांना भेट
कंधार-लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घोडज, संगमवाडी, बहाद्दरपुरा येथील पुल, तसेच फुलवळ गावातील जुना व नवा भाग यांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. काही घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीची पाहणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी केली. यावेळी माजी सरपंच संभाजीराव मंगनाळे मुकदम, गंगाधर शेळगावे, पत्रकार धोंडिबा बोरगावे, गंगाधर कागणे, माऊली घुगे आदींसह गावकरी उपस्थित होते.
—
जगतुंग सागर तलाव धोक्याच्या पातळीवर – ॲड. गंगाप्रसाद यन्नावार
कंधार शहरात मुसळधार पावसामुळे जगतुंग सागर तलाव पूर्ण भरला असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. मोठी दर्गा परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहोचले असून अशोकनगर, कोटबाजार, तलावकाटा, मानसपुरी या भागांना धोका निर्माण झाला आहे.
या स्थितीकडे लक्ष वेधत भाजपा कंधार शहराध्यक्ष ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

—
कंधार नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन
नगरपरिषदेने जाहीर केलेल्या सूचनेत म्हटले आहे की :
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांनी सतर्क रहावे.
उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून मण्यार नदी पुराच्या क्षमतेने वाहत आहे; त्यामुळे नदीपात्रात जाणे टाळावे.
शहरातील पाणी साचलेल्या विहिरी, खड्डे यापासून दूर रहावे.
गणपती विसर्जन किंवा इतर कारणास्तव जलाशयाजवळ जाणे कटाक्षाने टाळावे.
कोणतीही आपत्तीजनक स्थिती आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्वच्छता विभाग अथवा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवावे.



