दीपक मठपती | विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या अवघ्या सव्वा चार वर्षांच्या श्रेयंका श्रेयस कुलकर्णी हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिने संस्कृतमधील ३८ श्लोकांचे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र अतिशय कमी वेळेत मुखोद्गत म्हणून दाखविल्यामुळे तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
ही कामगिरी नाशिक तसेच मुंबईसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कारण तिचे वडील श्रेयस कुलकर्णी यांची जन्मभूमी नाशिक असून, सध्या ते मुंबई येथे कार्यरत आहेत.
—
श्रेयंका कुलकर्णी – संस्कार आणि कर्तृत्वाचा संगम
श्रेयंका ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट मुंबई येथे क्लास वन ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या श्रेयस कुलकर्णी यांची कन्या आहे.
तिची आई सौ. प्रियंका कुलकर्णी या महावितरण मंडळ, प्रकाशगड बांद्रा येथे डेप्युटी व्हिजिलन्स ऑफिसर आहेत.
तिचे आजोबा पांडुरंग कुलकर्णी हे प्रसिद्ध साहित्यिक, लेखक आणि कवी आहेत, तर आजी सौ. सविता कुलकर्णी या निवृत्त शिक्षिका असून सध्या विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शिशुवाटिका विभागाच्या सहप्रमुख तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालमंदिर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
घरातील या सशक्त सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरणामुळे श्रेयंका लहान वयातच उत्तम संस्कार लाभले आहेत.
—
वयाच्या चौथ्या वर्षीच अद्वितीय कर्तृत्व
श्रेयंका केवळ रामरक्षा स्तोत्रच नाही तर गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र यांसारखी अनेक स्तोत्रे सहज म्हणते.
तिला गाणी, गोष्टी, तसेच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी सतत प्रश्न विचारण्याची आवड आहे.
जून महिन्यात तिचा दादर, मुंबई येथील बालमोहन विद्यालयात शिशुवाटिकेत प्रवेश होत आहे.
—
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव
श्रेयंका हिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नंतर आता एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार असल्याची घोषणा झाली आहे.
याआधी तिला दादासाहेब फाळके यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या फिल्म सिटी, गोरेगाव येथे आयोजित महोत्सवात “परिवार काफ अवॉर्ड” हा ग्लोबल अवॉर्डही प्राप्त झाला आहे.
—
अभिमानाची बाब
“बालमनावर होणारे ० ते ६ वयोगटातील संस्कार हे आयुष्यभर टिकतात. बुद्धीचा जवळपास ९०% विकास याच वयात होतो”, असे तिच्या आजी सौ. सविता कुलकर्णी यांचे मत आहे. श्रेयंका हिच्या यशामुळे नाशिक व मुंबई या दोन्ही शहरांचा मान अभिमानाने उंचावला आहे.

