माणूस आणि निसर्ग यांचं नातं हे सहअस्तित्वाचं असावं अशी आपली शिकवण आहे. पण जेव्हा निसर्ग कोपतो, तेव्हा माणसाच्या मनातील खरी माणुसकी, खरी संवेदना आणि खरी करुणा यांचीच खरी परीक्षा होते. गेल्या काही दिवसांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आणि त्यातून आलेल्या भीषण पुराने ही परीक्षा पुन्हा एकदा आपल्या समाजासमोर उभी केली आहे. आणि दुर्दैव असं की, या परीक्षेत आपण शहरी माणसं पुन्हा एकदा नापास झालो आहोत.
ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यातील दरी केवळ सुविधा, रस्ते, वा संसाधनांची नाही; ती आहे संवेदनांची दरी. गावकुसाबाहेर पूरपाण्यात हरवलेल्या आयुष्याचा आवाज शहरी लोकांच्या कानावर पोचतच नाही. शहरातल्या इमारतींच्या छतांवरून पावसाचा नजारा पाहणारे, मोबाईलवर ‘फ्लड अपडेट्स’ स्क्रोल करत राहतात; आणि पुढच्या क्षणी पुन्हा दैनंदिन आयुष्याच्या गतीत रमून जातात. पण त्या दरम्यान, गावकुसाबाहेर काही घरं पाण्यात गिळंकृत होत असतात, काही शेतं मातीसकट वाहून जातात, सारं आसमान जणू एखाद्या अण्वस्त्राप्रमाणे मारा करतं असतं. निबिड अंधार,मुसळधार पाऊस नि निवार्याला काहीच नाही अशा स्थितीत ही माणसं कशी राहत असतील याची कल्पना तरी करवते का?
पूर्वी एखाद्या घराचं छप्पर उडालं की, सगळी वाडी एकत्र धावत येत असे. कारण तेव्हा शहरं आकारास आली नव्हती. किंवा शहर जन्मण्याचा तो काळ असावा .आज ग्रामीण माणूस शहरात गेला आणि शहराच्या संस्कृतीत रुतून बसला. कोणती आपत्ती असो, कुणाला काही द्यायचं असो मदतीपेक्षा फोटो आधी घेतला जातो. कुणी भेट दिली, कुणी अन्नधान्य नेलं, कुणी चादरी वाटल्या पण प्रत्येक ओंजळीत आता प्रसिद्धीचं ओझं आहे.सेवेचं रूपही आता सेल्फीच्या चौकटीत अडकून पडलं आहे.पुराच्या पाण्याने कितीतरी घरं वाहून गेली. कुणाचं छप्पर उडालं, कुणी चूल हरवली. काही घरांमध्ये म्हातारी माणसं होती, जी पाण्यातून बाहेर येऊ शकली नाहीत. गोठ्यात बांधलेली जनावरं दोर तोडून जाण्याच्या प्रयत्नातच गुदमरून मेली. मुलांच्या शाळेचं दप्तर, पुस्तकं, कपडे सगळं वाहून गेलं. शेतकऱ्याचं पीकच नाही, शेळ्या, कोंबड्या घरात जमवलेले धान्य तसंच त्यांचं मनही ओरबाडून नेलं. ही केवळ मालमत्तेची हानी नाही; ही आहे माणसाच्या अस्तित्वाची हानी.
मुलं अजूनही पाण्यात हरवलेल्या घराकडे पाहतात . विझलेल्या चुली पाहतात. किती आठवणींचं ओझं आहे. घोटाभर पाणी पाहिलं तरी मुलं भेदरलेल्या सारखी वागताहेत. अनेक दुखऱ्या आठवणींचं ओझं आहे. वृद्ध बायांच्या हातापायात कंप सुटलाय अधू डोळ्याने त्या चुलीकडे पाहतात, पण आता तिथं धूर नाही फक्त ओल आहे. चिखल आहे. या सगळ्या दृश्यांना पाहून जर डोळे ओले होत नसतील, तर आपण नक्कीच काहीतरी हरवलं आहे.
केवळ सरकार या मोडलेल्या घरांना पुन्हा उभं करू शकत नाही. कारण सरकार निधी देऊ शकतं, पण माणुसकी देऊ शकत नाही. मदत योजनांची कागदावरची रूपं वास्तवातील वेदना कमी करू शकत नाहीत. या परिस्थितीत उभं राहणं म्हणजे केवळ घर बांधणं नव्हे; तर मन पुन्हा जुळवणं. आणि ही जबाबदारी आहे आपणा सर्वांची.समाजाची, नागरिकांची, माणसांची.आज आपण उत्सवांच्या गदारोळात रमलो आहोत. धनदांडग्या बिल्डर्सनी आयोजित केलेल्या गरब्याच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांना पाण्यात बुडालेल्या गावांचं गुदमरलेपण दिसत नाही. देवतेच्या मूर्तीसमोर दीप लावणारे हात, डीजेच्या तालावर थिरकणारी पावलं पाण्यात वाहून गेलेल्या घराकडे एक क्षणभर वळतात का? उत्सवाचा उन्माद जर सहवेदनेला हरवून टाकत असेल, तर हा समाज माणुसकीच्या मार्गावरून भरटकला आहे. आपण देवतेची आरती गातो, पण तिच्या करुणेचं अनुकरण विसरतो.
खरं तर या क्षणी, देवता मंदिरी नव्हे तर त्या उद्ध्वस्त घरांमध्ये आहे; ती त्या आईच्या चेहऱ्यावर आहे जिचं लेकरं वाहून गेलं; त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आहे जो उभं पीक गमावूनही आशा शोधतोय.
पुरानं माती वाहून नेली, पण आपण माणुसकी पुन्हा रुजवू शकतो. शाळेचं दप्तर वाहून गेलं, पण शिक्षण अजून बुडालेलं नाही. घर मोडलं, पण नाती अजून टिकली आहेत. जर आपण संवेदनांचा पाया पुन्हा घातला, तर समाज पुन्हा उभा राहू शकतो.
उत्सवांचा कोलाहल थांबवून, सहवेदनेचा उत्सव सुरू करायची वेळ आली आहे.ही पूरस्थिती आपल्याला एकच शिकवण देते . निसर्गाच्या रौद्र रूपापेक्षा भयानक आहे माणसाची संवेदनशून्यता. ती बदलली, तरच समाज वाचेल. नाहीतर पाणी ओसरल्यानंतरही मनाच्या बकालपणाचा दुष्काळ कायम राहील.-डॉ विलास ढवळे.

