नांदेड :
फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतून प्रेरित होऊन समाजातील वंचित, शोषित घटकांच्या न्यायहक्कासाठी नेहमीच आघाडीवर उभे राहणारे निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्याम कांबळे यांना आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ठसा आपल्या आयुष्यात उमटवून खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला जोम देण्याचे काम कांबळे यांनी केले आहे. एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत ते गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, शोषितांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे आणि न्यायासाठी शेवटपर्यंत लढणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
महिला व मुलींवरील अत्याचार प्रकरणात अन्य कोणी तडजोडीचा मार्ग निवडत असताना कांबळे मात्र ठामपणे न्यायाच्या बाजूने उभे राहतात. पीडितेला कायदेशीर न्याय मिळेपर्यंत अथक लढा देणे ही त्यांची ओळख ठरली आहे. त्यामुळेच समाजघटकांमध्ये त्यांच्या प्रती एक वेगळी आपुलकी आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. “ज्या चळवळीला स्वतःची वृत्तपत्रे नसतात ती चळवळ वांझोटी ठरते,” या बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी सुरू केलेले ‘युगांतर’ हे वृत्तपत्र गेली दीड दशक मराठवाड्यातील वंचितांचा आवाज ठरत आहे. अजून शासनाच्या मान्यतेच्या यादीत नसतानाही आपला बाणेदारपणा, निर्भीडपणा व पत्रकारितेची सचोटी ‘युगांतर’ने जपली आहे.
मनमोकळा, दिलदार आणि संकटसमयी मदतीसाठी तत्पर मित्र म्हणूनही श्याम कांबळे समाजमनात स्थान मिळवून आहेत. त्यांच्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळींना अधिक बळ मिळावे, शोषित–वंचितांच्या न्यायहक्कासाठी त्यांची लढाई अधिक प्रभावी व्हावी, अशा शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त होत आहेत.
—
✍️ @राम तरटे
सहकार्यवाह – मराठवाडा साहित्य परिषद शाखा, नांदेड
मा. सरचिटणीस – जिल्हा मराठी पत्रकार संघ, नांदेड

