नांदेड (प्रतिनिधी )
देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर सुनावणीच्या वेळी हल्ल्याचा प्रयत्न करून न्यायव्यवस्थेची पवित्रता भंग करणाऱ्या आरोपीविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश भाईचारा कमिटीचे अध्यक्ष ॲड. एल. बी. इंगळे यांनी केली आहे.
सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान एक वकील राकेश किशोर या व्यक्तीने “हिंदुस्तान आता सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देत पायातील बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या निर्लज्ज कृत्यामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून, हे लोकशाही आणि संविधानावर केलेले थेट आक्रमण असल्याचे ॲड. इंगळे यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, “अशा कृत्यामुळे देशातील संविधानिक लोकशाही, सर्वसामान्यांचे न्यायाधिकार, तसेच देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आली आहे. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि पावित्र्य भंग करणाऱ्या समाजविरोधी, धर्मांध घटकांना सत्तेचा आश्रय मिळत आहे, हे चिंताजनक आहे.”
देशात जातीय आणि धर्माध मानसिकतेला खतपाणी घालणारे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप करत ॲड. इंगळे म्हणाले, “देशातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेची माफी मागावी.”
याचसोबत त्यांनी बहुजन समाज, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक घटकांना आवाहन केले की, अशा धर्माध आणि सनातनी विचारसरणीला पाठबळ देणाऱ्या सरकारविरुद्ध एकत्र येऊन संविधानवादी व लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे.
ॲड. इंगळे यांनी शेवटी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सरन्यायाधीशांवरील हा हल्ला केवळ व्यक्तीवर नसून तो भारतीय न्यायव्यवस्था, लोकशाही आणि संविधानावर केलेला गंभीर प्रहार आहे. देशाला लाजवणारे असे कृत्य सहन केले जाणार नाही.”
(बहुजन समाज पार्टी – महाराष्ट्र प्रदेश भाईचारा कमिटीचे अध्यक्ष ॲड. एल. बी. इंगळे )

